शिंदे वासुली -शेकडो भामाआसखेड प्रकल्पग्रस्तांनी शनिवारी (दि. 6) सकाळी आसखेड हद्दीत सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामाशेजारीच रस्त्यावर ठिय्या मांडून शासनाचा निषेध केला. शासनाच्या फसवेगिरीने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी काम बंद पाडण्याच्या निर्धाराने शासनाविरुद्ध घोषणाबाजी केली.
दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधी व आंदोलक प्रमुखांनी शुक्रवार दि. 12 तारखेपर्यंत काम थांबण्याचा व योग्य निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकरी काहीसे शांत झाले. करोनामुळे मोठ्या संख्येने एकत्र येऊन आंदोलन केल्याने संचारबंदीचे उल्लंघन होत असेल तर इथून पुढे मागण्या मान्य होईपर्यंत प्रत्येक प्रकल्पग्रस्त आपल्या कुटुंबासह धरणाच्या पाण्यात जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्धार करून शासनाला इशारा दिला आहे. तसे निवेदन खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांना देऊन आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.
पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.5) प्रकल्पग्रस्तांना ठोस आश्वासन न दिल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी पालकमंत्री निघून जाताच आंदोलन करून जलवाहिनीचे काम बंद करणार असल्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सकाळपासूनच जलवाहिनीचे काम सुरू असलेल्या आसखेड परिसरातील रस्त्यावर पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडून कडक बंदोबस्त ठेवला होता.
पिंपरी-चिंचवडचे सहायक आयुक्त रामनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगे इंगळेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्यासह चाकण, महाळुंगे इंगळे, पाईट पोलीस ठाण्याचे दहा अधिकारी, पोलीस कर्मचारी व राज्य राखीव शीघ्र कृती दलाचे जवान असे 150 पोलिसांचा आसखेड फाटा, जलवाहिनी परिसर, धामणे फाटा व करंजविहिरे अशा ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.
भामाआसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे 100 टक्के पुनर्वसन झाल्याखेरीज जिल्हाधिकाऱ्यांनी व पुणे महानगरपालिकेने निर्देशित केलेले आसखेड हद्दीतील एक किमी जलवाहिनेचे काम सुरू न करण्याचे लेखी आश्वासन देऊनही करोनाच्या संचारबंदी काळाचा गैरफायदा घेऊन पोलीस बंदोबस्तात काम कसे सुरू केले? आम्ही संचारबंदीचे मुद्दाम उल्लंघन करून काम अडवायला आलो नाही. आम्हाला तसे करण्यास शासनाने भाग पाडले, असे आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या आंदोलनामध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, सत्यवान नवले, देविदास बांदल, गजानन कुडेकर, माजी सरपंच किसन नवले, धोंडीभाऊ कुडेकर, चंद्रकांत शिंदे, तुकाराम नवले, भागूजी राजगुरव, अण्णा देवाडे, पाटीलबुवा काळोखे, निवृत्ती नवले, स्वप्नील येवले, गणेश जाधव यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सगळ्या शेतकऱ्यांनी तोंडाला मास्क व सामाजिक अंतर राखले होते.
कसा विश्वास ठेवायचा?
चक्रीवादळाने आम्हा शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. करोनाची दहशत आहे. तरीही आम्ही जीवाची पर्वा न करता आंदोलन करतोय. प्रशासन वचनाला जागले नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनाला किंमतच नसेल तर आम्ही तालुका प्रशासनावर विश्वास कसा ठेवायचा ? असा सवाल करीत शनिवारी जलवाहिनीचे काम बंदच करणार, प्रसंगी अटक झाली तरी चालेल. असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता.