नगर – भिंगार शहरात लॉकडाऊनच्या काळात गाई चोरुन त्यांची कत्तल करीत मटण विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच भिंगार शहरातील अनाधिकृत कत्तलखाने तत्काळ उध्वस्त करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे आज करण्यात आली.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर-जिल्हा संघटक मतीन सय्यद यांनी या मागणीसंदर्भात पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. भिंगारच्या युवक आघाडीचे शहराध्यक्ष संजय खताडे, किशोर गोंधळे, मयूर तोरडी, आकाश चव्हाण, संकेत चव्हाण, मयूर चव्हाण, नईम शेख आदि उपस्थित होते.
भिंगारमध्ये मोठ्या संख्येने गवळी समाज बांधव वास्तव्यास आहे. येथील समाज बांधव म्हशी व गायच्या दूधाचा व्यवसाय करतात.
लॉकडाऊन काळात येथील गवळी समाज बांधवांच्या अनेक गाया चोरीस गेल्या. गाई मालक पोलीस स्टेशनला गेले असता त्यांची तक्रार देखील घेण्यात आलेली नाही. या भागातील नागरिकांनी गाय चोर पकडून दिले असता पोलीसांनी त्यांच्यावर कारवाई न केल्याने या भागात गाय चोरांची टोळी सक्रीय झाली असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.