नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील आपला हल्ला अधिक तीव्र करताना कॉंग्रेसने आज पंतप्रधान मोदींनी पीएमकेअर्स फंडात चिनी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात देणग्या स्वीकारल्याचा आरोप केला आहे. पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनुसिंघवी यांनी म्हटले आहे की लडाख मध्ये चिनशी संघर्ष सुरू असतानाही चिनी कंपन्यांकडून देणग्या स्वीकारण्याचे काम सुरूच होते.
चीनने भारतात घुसखोरी केली आहे असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिनला घुसखोर म्हणणे टाळले आहे त्याबद्दलही त्यांनी मोदींवर टीका केली आहे. राजीव गांधी फौंडेशनला चीनकडून 20 वर्षांपुर्वी देणगी देण्यात आली होती यावरून भाजपने कॉंग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला होता पण गेले दोन दिवस कॉंग्रेसकडून भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले जात असून चीनचे आणि भाजपचेच कसे जवळीकीचे संबंध आहेत आणि त्यांना चीनकडून कशी आर्थिक मदत मिळाली आहे याचे तपशीलही कॉंग्रेसकडून दिले जात आहेत.
आज या अनुषंगाने बोलताना सिंघवी म्हणाले की, चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी भाजपचे सन 2007 पासून घनिष्ट संबंध आहेत. त्यानुसार राजनाथसिंग, नितीन गडकरी, अमित शहा यांनी अनेक वेळा चीनला भेटी दिल्या आहेत. गेल्या 13 वर्षात भारतातीाल कोणत्याही राजकीय पक्षाचे अध्यक्ष चीनशी इतक्या घनिष्ट संबंधात आलेले नाहीत असेही सिंघवी यांनी म्हटले आहे.
राजनाथसिंह हे चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या निमंत्रणावरून जानेवारी 2007 आणि ऑक्टोबर 2008 ला चीनला गेले होते. गडकरी हे जानेवारी 2011ला त्यांच्या निमंत्रणावरून चीनला पाच दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते. अमित शहांनी आमदारांचे एक मोठे शिष्टमंडळ सन 2014 ला कम्युनिस्ट पक्षाच्या निमंत्रणावरून चीनला पाठवले होते असा दावाही त्यांनी केला.
चिनने भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची दिशाभुल केली आहे असा आरोपही त्यांनी केला. चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे काय हे पंतप्रधानांनी स्पष्ट करावे असे आवाहनही िंसंघवी यांनी केले.