परभणी: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी परभणी येथील सभेत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. “फुकटचा ताठा अन् नाव उबाठा” असे खोचक वक्तव्य करत, मराठवाड्यात बिनकामाचे लोक फिरत असल्याचा टोला त्यांनी लगावला. ठाकरे यांनी महायुती सरकारला ‘दगाबाज’ संबोधून शेतकऱ्यांसाठी ‘वोटबंदी’चे आवाहन केले होते. याला प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले, “विरोधक आम्हाला दगाबाज म्हणतात, पण खरे दगाबाज तेच आहेत, ज्यांनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली.” शेतकऱ्यांच्या मदतीवरून त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. “मराठवाड्यात नुसतेच येऊन गेले, एक बिस्किटचा पुडाही देऊन गेले नाहीत. माझ्या हातात काही नाही म्हणणारे हे लोक फुकटचा ताठा बाळगणारे आहेत,” अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंना लक्ष्य केले. राज्यात शेतकरी संकटात असताना महायुती सरकारने 32 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले असून, कर्जमाफीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. “ओठावर भवानी आणि पोटात बेईमानी असणाऱ्यांनीच राज्य दूषित केले आहे,” अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, या दौऱ्यात जालना येथे शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांचा शिंदे गटात प्रवेश झाला. आंबेकर यांनीही पक्षप्रवेशावेळी, निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना पदे दिल्याबद्दल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिंदेंच्या या सभेमुळे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.