- रेडिओ ऍक्टीव्ह लहरी : पर्यावरणावर होतोय घातक परिणाम
चऱ्होली – वाढत्या शहरीकरणात मोठ मोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. या सिमेंटच्या जंगलात हिरवीगार झाडांची वनराई लुप्त झाली असून, इमारतीतील वृक्षांची जागा आता मोबाइल टॉवरने घेतली आहे. मोकळी जागा असो वा टेरेसवरच्या जागेवर महिन्याकाठी मिळणारा मोबदल्यासाठी मोबाइल टॉवर उभारण्यात नागरिकांचा कल वाढत आहे. दिवसेंदिवस या टॉवरच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून, यामधून निघणाऱ्या रेडिओ ऍक्टीव्ह लहरींचा पर्यावरणावर घातक परिणाम होऊन अनेक पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
शहरातील पक्ष्यांचा किलबिलाट शांत झाला आहे. घरातील फोटोमागे घरटे करून राहणारी चिमणी नामशेष होत चालली आहे. त्या लहरींचा पर्यावरणावर जेवढा परिणाम होत आहे तेवढाच मानवी आरोग्यावरही परिणाम होत आहे. परंतु जागतिकीकरण आणि अर्थकारणापुढे सर्व थिटे आहे.
उंच इमारतींना टॉवर बसविण्यासाठी पसंती दिली जात आहे. शहरात मोबाइल टॉवरच्या संख्येत वाढ झाल्याने त्यामधून निघणाऱ्या रेडिओ ऍक्टीव्ह लहरींचे उत्सर्जन वाढले आहे. यामुळे उष्णतेमध्ये वाढ झाल्याचे जाणवते. नवीन झालेल्या वसाहतीत अनेक मोबाइल कंपनी टॉवर उभारण्यासाठी आग्रही असतात. मात्र महिन्याकाठी काही न करता भाडे रूपात मिळणाऱ्या वीस हजार ते पंचवीस हजार रुपयांसाठी इमारतीवर टॉवर बसविण्यासाठी नागरिकांची चढाओढ असते. एका उंच इमारतीची निवड करून हा टॉवर इमारतीच्या गच्चीवर बसविला जातो.
मोबाइल टॉवर, जनरेटर सेट, बॅटरी असे अंदाजे तीन ते चार टन वजनाचा अतिरिक्त भार लादला जातो. यासाठी लागणारी वीज मालकांकडून घेतली जाते. वेगळा खर्च करावा लागत नाही, शिवाय रहिवासी जागेत असल्याने सुरक्षारक्षकाची गरज भासत नाही. त्याचा थोडाफार मोबदला मालकाला दिल्या जातो. मोकळ्या जागेत टॉवरला जागेचे भाडे, उंच टॉवर उभारण्यासाठी लागणारा खर्च, सुरक्षारक्षक असा वाढता खर्च कमी करण्यासाठी मोबाइल कंपन्या इमारतींना प्राधान्य देतात.
चिमणी, कावळे झाले नामशेष
टॉवरमधून निघणाऱ्या रेडिओ ऍक्टीव्ह लहरींचा पर्यावरणावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते. आधी दिसणारा चिमण्या, कावळे यांचा थवा आता दिसेनासा झाला. परिणामी पर्यावरणप्रेमी चिमणी दिवस साजरा करीत पर्यावरण संवर्धनाचे काम करतात. पक्ष्यांच्या अनेक जाती नष्ट झाल्याने निसर्गाची समतोल बिघडला आहे. पक्ष्यांची संख्या कमी झाल्याने नैसर्गिक पद्धतीने होणारे झाडांचे रोपण घटले आहे. झाडावर असलेले पक्ष्यांचे घरटे मोडकळीस आले आहेत.
मानवी स्वास्थ्य बिघडले
मोबाइल टॉवर्समधून निघणाऱ्या घातक लहरी ह्या सदैव ऍक्टीव्ह असतात. डोळ्याने दिसत नसल्या तरी कालांतराने होणारे त्याचे परिणामी मानवी जीवनावर दिसतात. टॉवरमधून निघणाऱ्या लहरी तुमच्या घरात असणाऱ्या मोबाइलसोबत जोडलेल्या असतात. तुम्ही वापरत असलेला मोबाइल फोन हाताळताना शरीरापासून दूर ठेवावा. शरीराच्या छातीजवळ, डोक्याजवळ, खिशात ठेवल्याने मांडीजवळ सतत मोबाइल ठेवल्यामुळे हातापायांना मुंग्या येणे, डोके जड होणे, डोळ्यांची जळजळ, लहरींचा मासपेंशींसोबत संपर्क आल्याने त्या ठिकाणच्या पेशी मृत होत असल्याचे वैज्ञानिकांनी प्रयोगाअंती सिद्ध केले असून, तज्ज्ञ डॉक्टरांनी याला दुजोरा दिला आहे.