युवक कॉंग्रेसने हाती घेतली देशव्यापी मोहीम
नवी दिल्ली : बेरोजगारांसाठी राष्ट्रीय नोंदणीपुस्तक (एनआरयू) बनवण्याची आग्रही मागणी युवक कॉंग्रेसने केली आहे. एनआरसी नको; एनआरयू आणा, अशी भूमिका घेत युवक कॉंग्रेसने गुरूवारपासून देशव्यापी मोहीम सुरू केली.
नागरिकत्व दुरूस्ती कायदा (का) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीपुस्तकावरून (एनआरसी) सध्या देशातील वातावरण तापले आहे.
अशातच बेरोजगारीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला घेरण्याची रणनीती कॉंग्रेसने आखली आहे. त्यासाठी युवक कॉंग्रेस संघटना पुढे सरसावली आहे. एनआरयूच्या मागणीसाठी कॉंग्रेसच्या येथील मुख्यालयात देशव्यापी मोहीम सुरू करताना युवक कॉंग्रेसने बेरोजगारांना साद घातली. बेरोजगार तरूणांनी मागणीला पाठिंबा देण्याचे आवाहन युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी केले.
याआधी आपण शेतकरी आत्महत्याबाबत ऐकायचो. आता तरूण आत्महत्या करत असल्याचेही ऐकावे लागत आहे. देशात दररोज 36 तरूण जीवन संपवतात. बेरोजगारीच्या प्रमाणाने मागील 45 वर्षांतील उच्चांक गाठला आहे. त्यामुळे बेरोजगारीच्या समस्येकडे आम्हाला मोदी सरकारचे लक्ष वेधायचे आहे.
आम्हाला का किंवा एनआरसीबाबत सरकारकडून काही ऐकायचे नाही. रोजगार वाढवण्यासाठी कुठली पाऊले उचलली जात आहेत ते सरकारकडून ऐकण्याची आम्हाला इच्छा आहे, अशी भूमिका युवक कॉंग्रेसकडून मांडण्यात आली.