पाटण (प्रतिनिधी) -पाटण तालुक्यात करोना बाधितांच्या संर्पकांत आलेल्या काहींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांचे खाण्यापिण्याचे चोचले दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. रोज वेगवेगळी मागणी केली जात आहे. एकाने तर माझा मुलगा रोज मटण खाल्ल्याशिवाय झोपत नाही. त्याला रोज मटण दिले पाहिजे, असे फर्मान पाटणच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोडल्याने रडावे की हसावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. विलगीकरण कक्षातील लोकांच्या वेगवेगळ्या मागणीमुळे प्रशासनाची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे.
गत एक महिन्यापूर्वी पाटण तालुक्यात डेरवण वगळता कुठेच करोनाबाधित रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, गटविकास अधिकारी मिना साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी आर. बी. पाटील, सी. के. यादव यांच्यासह तलाठी, मंडलाधिकारी, आशा, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस यंत्रणा व विविध विभागातिल कर्मचारी यांचे कामाचे कौतुक होत होते.
सुरूवातीच्या काळात डेरवण येथील 11 महिन्याचे बाळ सापडल्याने त्यांच्या संर्पकात आलेल्या व्यक्तींना चौदा दिवस पाटण येथील करोना विलगीकरण कक्षात ठेवले होते. त्याही लोकांनी संयम दाखवत सामाजिक बांधिलकी म्हणून 14 दिवसांच्या काळात एकही तक्रार न करता ते दिवस संयमाने काढले. चौदा दिवसानंतर दुसऱ्या चाचणीत ते बाळ निगेटीव्ह आल्यानंतर पाटण तालुक्याने नि:श्वास सोडला.
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात शासनाने ई पास योजना सुरु करत गेले दोन महिने पुणे-मुंबई येथे अडकलेल्या लोकांना आपल्या घरी जाण्याची संधी दिली. हजारो नागरिक परत आल्याने तालुक्यातील अनेक गावे व वाड्या-वस्त्यांवर प्रचंड गर्दी झाली. हातावर क्वारंटाइनचे शिक्के असतानाही हे पुणे-मुंबईकर मोकाट फिरू लागले. त्यांना गाव समितीने अनेकवेळा हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाच अरेरावीची भाषा करण्यात येत आहे. तर अनेक लोक विनापरवाना दाखल झाले आहेत. वास्तविक पाहता त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे तालुक्यात करोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे.
या करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. या कक्षात ठेवण्यात आलेल्या नागरिकांकडून बिसलरीचे पाणी, फरसाण, फास्टफूड तसेच मोबाईल रिचार्जची मागणी होऊ लागली आहे. एका बहाद्दराने तर चक्क माझ्या मुलाला दररोज मटण लागते. त्यामुळे त्याला दररोज मटण देण्याची व्यवस्था करा, असे फर्मान प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना सोडले आहे.
त्याबरोबरच ग्रामीण भागातील शाळा व घरांमध्ये क्वारंटाइन केलेल्या लोकांकडूनही आमच्या घरी बाजार आणून द्या, पाणी भरा अशा सूचना केल्या जात आहे. तसेच आमचे न ऐकल्यास आम्ही विलगीकरण कक्षातून बाहेर पडून अशा धमक्या दिल्या जात आहेत. इतर नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने शासकीय कर्मचारी नाईलाजात्सव विलगीकरण कक्षातील लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आटापिटा करत आहेत. मात्र, हे नागरिक शासकीय यंत्रणेची डोकेदुखी वाढवत असल्याचे दिसून येत आहे.