सालेम – तामिळनाडूमधील तुतिकोरिन जिल्ह्यात पोलिसांच्या कोठडीमध्ये पिता-पुत्राचा मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री के. पलानीस्वमी यांनी रविवारी या निर्णयाची घोषणा केली.
राज्य सरकारचा हा निर्णय या प्रकरणी सुनावणी करणाऱ्या मद्रास हायकोर्टाला कळवला जाणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला हायकोर्टाकडून मंजुरी मिळाल्यावर हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित केले जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले.
पी. जयराज आणि त्याचा मुलगा फेनिक्स यांनी लॉकडाऊनच्या काळात सेल फोनचे दुकान सुरू ठेवल्याने लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र कोविलपट्टी येथील रुग्णालयात 23 जून रोजी त्यांचे निधन झाले होते.
सथानकुलाम पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केलेल्या जबर मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेने देशपातळीवर मोठी खळबळ उडाली असून दोन उपनिरीक्षकांसह चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.