नवी दिल्ली – पश्चिम बंगाल मधील तृणमुल कॉंग्रेसच्या एका शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगाची भेट घेऊन त्यांना ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन सादर केले. हा केवळ एक दुर्देवी प्रसंग नव्हता तर तो एक सुनियोजित कट होता असे या पक्षाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
तृणमुलचे सहा सदस्यांचे शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाच्या तिन्ही आयुक्तांना एकत्रित भेटले. सुमारे तासभर त्यांनी निवडणूक आयुक्तांशी चर्चा केली आणि त्यांना एक सविस्तर निवेदन सादर केले. भारतीय जनता पक्षाचे नेते सोशल मिडीयाच्या माध्यमातून ममतांना सतत कशा धमक्या देत आहेत याच्या कहाण्याही त्यांनी सादर केल्या. ममतांवर नंदीग्राम येथे हल्लाच झाला आहे. तो अपघात नव्हता. हा एक सुनियोजित कटच होता असेही तृणमुल कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाचे म्हणणे होते.
आयोगाला जे एक निवेदन देण्यात आले आहे त्यात या हल्ल्याबद्दल भाजपचे उमेदवार सुवेंदु अधिकारी यांना जबाबदार धरण्यात आले आहे. ममतांच्या अपघाताच्या संबंधात दोन जणांना प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून भाजपने सादर केले आहे. त्यात त्यांनी ममतांवर हल्ला झाला नव्हता तर त्यांची कार एका लोखंडी पिलरला धडकून हा अपघात झाल्याचे म्हटले होते. यात भाजपने चित्तरंजन दास आणि देवव्रत दास यांना प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार म्हणून उभे केले असून ते सुवेंदु अधिकारी यांच्याशीच संबंधीत आहेत असेही तृणमुलच्या नेत्यांचे म्हणणे आहे.