Delhi U23 Cricketers : दिल्ली क्रिकेट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! पुद्दुचेरी दौऱ्यावर गेलेल्या २ खेळाडूंवर गंभीर आरोप
Delhi U23 Cricketers : दिल्लीच्या २३ वर्षांखालील क्रिकेटपटूंवर १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा छळ केल्याचा आरोप आहे.

Delhi U23 Cricketers Controversy in Puducherry Tour : दिल्ली क्रिकेटमधील प्रशासन आणि खेळाडूंची कामगिरी नेहमीच चर्चेचा विषय असते, मात्र आता एका गंभीर प्रकरणामुळे दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटना (DDCA) अडचणीत आली आहे. पुद्दुचेरी दौऱ्यावर गेलेल्या दिल्लीच्या अंडर-२३ क्रिकेट संघातील दोन खेळाडूंवर एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
दिल्लीचा अंडर-२३ संघ सध्या एका स्पर्धेसाठी पुद्दुचेरीमध्ये आहे. या दौऱ्यादरम्यान संघातील दोन खेळाडूंनी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप समोर आला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून डीडीसीएने तातडीने पावले उचलत दोन्ही संशयित खेळाडूंना उर्वरित संघापासून वेगळे केले असून त्यांना दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे. या प्रकरणाची सध्या अधिकृत चौकशी सुरू आहे.
शिस्तीवर प्रश्नचिन्ह?
या घटनेनंतर डीडीसीएच्या शिस्तपालन व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. तरुण खेळाडूंमध्ये अशा प्रकारची प्रवृत्ती वाढणे हे खेळाच्या प्रतिमेसाठी घातक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जर या प्रकरणात कडक कारवाई झाली नाही, तर युवा खेळाडूंमध्ये चुकीचा संदेश जाईल, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
दिल्लीच्या २३ वर्षांखालील क्रिकेटपटूंवर १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा छळ केल्याचा आरोप
डीडीसीएचे अधिकृत स्पष्टीकरण –
या वादावर डीडीसीएचे सहसचिव अमित ग्रोव्हर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विनयभंगाचे आरोप फेटाळून लावत हे प्रकरण केवळ बेशिस्तीशी संबंधित असल्याचे म्हटले आहे.
“दोन्ही खेळाडू हॉटेलच्या खोलीत मोठ्या आवाजात गाणी ऐकत होते, ज्यावर हॉटेल कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. आतापर्यंत तरी छेडछाडीची कोणतीही अधिकृत तक्रार किंवा घटना समोर आलेली नाही,” असे ग्रोव्हर यांनी स्पष्ट केले.
पुढील कारवाईकडे लक्ष –
सहसचिवांनी छेडछाडीचा आरोप फेटाळला असला तरी, डीडीसीए या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतरच या खेळाडूंवर काय कारवाई करायची, याचा निर्णय घेतला जाईल. दिल्ली क्रिकेटसाठी हा काळ अत्यंत संवेदनशील असून, या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





