वंदना बर्वे
दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यांत कॉंग्रेसचे पानिपत केल्यानंतर गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये भाजपला भुईसपाट करण्याची केजरीवाल यांची योजना आहे. शिवाय, विरोधी पक्षांच्या राष्ट्रीय आघाडीत आपलं महत्त्वाचे स्थान निर्माण करण्यासाठी डावपेच आखत आहेत.
दिल्ली पाठोपाठ पंजाबमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या अंगात बारा हत्तीचं बळ संचारलं आहे. आगामी काळात गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणे आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये “हात’ दाखविल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य गुजरात आणि हिमाचल प्रदेश जिंकण्यासाठी केजरीवाल यांनी दंड थोपटले आहे. महत्त्वाचे म्हणजे, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या गृहराज्य गुजरातमध्ये मोठा “बॉम्ब’ फोडण्याची केजरीवाल यांची योजना आहे.
हे बॉम्ब कॉंग्रेसमधून आयात केले जाणार आहेत. आम आदमी पक्षाने कॉंग्रेसचे स्थानिक नेते हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवाणी यांना गळाला लावण्यासाठी डावपेच आखायला सुरुवात केली आहे. 2017 च्या निवडणुकीत या दोन्ही नेत्यांनी कॉंग्रेसला सत्तेच्या दारापर्यंत पोहोचविण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. गुजरातमध्ये कॉंग्रेस पक्षाची अवस्था फ्युज उडाल्यासारखी आहे. याच कारणामुळे हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवाणी अस्वस्थ आहेत. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी या दोन्ही नेत्यांना आम आदमी पक्षात सामील कसे करून घेता येईल यावर मंथन सुरू आहे. याशिवाय, हिमाचल प्रदेशात कॉंग्रेसचे कोणते नेते असमाधानी आणि अस्वस्थ आहेत याचाही शोध केजरीवाल यांच्या पक्षाकडून घेतला जात आहे.
आपने दोन्ही राज्यांमध्ये निवडणूकपूर्व सर्वेक्षण केले असून हिमाचलमध्ये चांगले प्रदर्शन करण्याची केजरीवाल यांना आशा आहे. हिमाचलमध्ये कॉंग्रेसची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे आणि नागरिक भाजपच्या पर्यायाचा शोध घेत आहेत. आपल्याला चालून आलेली ही आयती संधी होय, असं आपचं मत आहे. आपला दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता मिळाली हे खरं असलं तरी या दोन्ही राज्यांमध्ये कॉंग्रेसचे सरकार होते. शिवाय भाजपची अवस्था कमजोर होती आणि आता ज्या राज्यांमध्ये केजरीवाल यांना “झाडू’ फिरवायचा आहे त्या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं शासन आहे. याचा अर्थ आपला भाजपशी सामना करावा लागणार आहे.
खरं सांगायचं म्हणजे, गुजरात आणि हिमाचलमध्ये चांगले प्रदर्शन करण्याचे स्वप्नं केजरीवाल उगाच पाहात आहेत, अ
सं अजिबात म्हणता येणार नाही. नरेंद्र मोदी यांची देशात त्सुनामी आली होती त्या काळात केजरीवाल यांनी एकहाती दिल्ली जिंकली होती. केजरीवाल यांच्या “दिल्ली मॉडेल’ची चर्चा देशभरात आहे. विविध राज्यांमधील प्रमुख दिल्लीत मोहल्ला क्लिनिक आणि शाळा बघायला येतात. त्याचं अनुकरण करतात. मोहल्ला क्लिनिक आणि शाळेच्या याच मॉडेलची जादू गुजरात आणि हिमाचलमध्येही चालेल, असं केजरीवाल यांना वाटत आहे. यात भर पडली ती, दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीची. दिल्लीतील तिन्ही महापालिकांना एक करण्यात आले असून मनपाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. तिन्ही पालिका भाजपच्या ताब्यात आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या महानगरपालिका आपच्या ताब्यात गेल्या तर चुकीचा संदेश जाईल. याचा परिणाम गुजरातच्या निवडणुकांवर होईल, या भीतीने निवडणुका टाळल्याचा आरोप आपने केला आहे.
भाजप आणि आपला निवडणुकांमध्ये जे यश मिळत आहे त्यामागचे कारण वेगवेगळे आहे. दोन्ही पक्षांचे शक्तिस्थान वेगवेगळे आहे. भाजपचा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता, भाजपची निवडणूक स्ट्रॅटेजी यावर आधारित आहे. तर आम आदमी पक्षाच्या विजयाचे गमक कार्यकर्त्यांच्या कष्टात आहे. कॉंग्रेस आणि भाजपसह विविध पक्षांमध्ये दुसऱ्या पक्षांतील नेत्यांना फोडून आपल्या पक्षात आणण्याची प्रथा आहे. या नेत्यांना आपल्या पक्षात आणून त्यांना तिकीट दिली जाते. यामुळे पक्षाचा मूळ कार्यकर्ता जो सुरुवातीपासून पक्षासाठी कष्ट घेत आहे त्याचा हिरमोड होतो. आम आदमी पक्षाला ही किड अद्याप लागलेली नाही. हाच फरक कार्यकर्त्यांना आम आदमी पक्षाशी जोडून ठेवतो.
2024 मधील लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देणाऱ्या विरोधी पक्षांच्या आघाडीत देशपातळीवर महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी अरविंद केजरीवाल आसुसलेले आहेत. तसं बघितलं तर, अशा प्रकारचे स्वप्न यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही पडले होते; परंतु यात त्यांना फारसे यश आले नाही. पंजाब विजयानंतर केजरीवाल यांचा आत्मविश्वास मात्र बळावला आहे. 2024 मध्ये विरोधी पक्षांच्या आघाडीचं नेतृत्व कोण करणार? या प्रश्नाचं उत्तर सध्या शोधलं जात आहे. ही भूमिका बजावण्यासाठी अनेक नेते तयार आहेत. मात्र, या शर्यतीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अग्रभागी आहेत. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला सरकार स्थापन करण्यात यश मिळाल्यानंतर केजरीवाल यांनी 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. केजरीवाल यांनी गुजरात, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका लढवण्याची तयारी सुरू केली असून कॉंग्रेससोबत उभ्या असलेल्या पक्षांनाही सोबत आणण्याच्या कामाला लागली आहे.
झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि संयुक्त पुरोगामी आघाडीतील प्रमुख घटक पक्ष तसेच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या भेटीनंतर केजरीवाल यांनी आपला मोर्चा दक्षिणेकडे वळविला आहे, असे दिसून येते. तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकलाही आम आदमी पक्षाचे दिलली मॉडेल पसंत पडू लागले आहे. द्रमुकचे प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी अलीकडे दिल्लीतील शाळा आणि मोहल्ला क्लिनिकची पाहणी केली. स्टॅलिन यांनाही इतरांप्रमाणे कॉंग्रेसची निष्क्रियता अस्वस्थ करू लागली आहे. स्टॅलिन आता दिल्लीत नवा मित्र शोधत आहेत. केजरीवाल यांच्या रूपाने तो मिळाला असेही म्हणायला हरकत नाही. उत्तर भारतात झपाट्याने आपला प्रभाव वाढवणारा आम आदमी पक्ष आणि दक्षिणेत सत्ता असलेला द्रमुक एकत्र आल्यास दिल्लीत मोठी ताकद बनू शकते, असं दोघांनाही वाटते.
केजरीवाल आणि स्टॅलिन यांची राजकीय मैत्री काय रंग आणते हे पाहावे लागेल. तूर्तास आम्ही एकमेकांपासून बरेच काही शिकत आहोत, असं केजरीवाल यांचं म्हणणं आहे. मात्र, ही देवाणघेवाण राजकीय समझोत्यापर्यंत पोहोचली, तर देशाच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळाल्याचे बघायला मिळेल.