Delhi HC Dismisses Petition Against BCCI ‘Team India’ Name : भारतीय क्रिकेट संघाला ‘टीम इंडिया’ किंवा ‘भारताचा क्रिकेट संघ’ म्हणून संबोधण्यास मनाई करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. वकील रीपक कंसल यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) विरोधात दाखल केलेली ही याचिका न्यायालयाने ‘निव्वळ वेळेचा अपव्यय’ असल्याचे सांगत धुडकावली. कंसल यांनी याचिकेत दावा केला होता की, बीसीसीआय ही एक खासगी संस्था असून, भारत सरकारने तिला क्रिकेट संघाला ‘टीम इंडिया’ म्हणून संबोधण्याची परवानगी दिलेली नाही. त्यांच्या मते, बीसीसीआय भारतीय क्रिकेट संघाचे अधिकृत राष्ट्रीय प्रतिनिधित्व करत असल्याचा चुकीचा आभास निर्माण करते. याचिकेत म्हटले होते की, प्रसार भारतीसारख्या माध्यमांद्वारे, जसे की दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ, बीसीसीआयच्या संघाला ‘टीम इंडिया’ किंवा ‘भारताचा क्रिकेट संघ’ असे संबोधले जाते. तसेच, क्रिकेट स्पर्धांमध्ये भारताचा ध्वज वापरून खासगी संस्थेला अप्रत्यक्षपणे राष्ट्रीय दर्जा दिला जातो, ज्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतो आणि बीसीसीआयला व्यावसायिक वैधता मिळते. हेही वाचा – Harshit Rana : अश्विनचा हर्षित राणाच्या निवडीवर ‘गंभीर’ सवाल, काय आहे कारण? मात्र, मुख्य न्यायाधीश डीके उपाध्याय आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला खडे बोल सुनावले. “हा न्यायालयाचा आणि तुमच्या वेळेचा निव्वळ अपव्यय आहे,” अशी स्पष्ट टिप्पणी खंडपीठाने केली. न्यायालयाने याचिकाकर्त्याला जागतिक क्रीडा क्षेत्राचे कार्य कसे चालते याची माहिती घेण्याचा सल्ला दिला. “क्रीडा संघटना स्वतंत्रपणे कार्यरत असतात आणि त्यात कोणत्याही राज्याचा हस्तक्षेप नसावा, यासाठी स्वतंत्र यंत्रणा असते,” असे न्यायालयाने नमूद केले. हेही वाचा – IND W vs SA W : स्मृती मंधानाने वनडेत रचला इतिहास! षटकार ठोकत मोडला २८ वर्षांचा विश्वविक्रम या निर्णयामुळे बीसीसीआयच्या संघाला ‘टीम इंडिया’ म्हणून संबोधण्याच्या प्रथेवर कोणताही परिणाम होणार नाही. भारतीय क्रिकेट संघाच्या नावावरून कट्ट्यापासून ते न्यायालयापर्यंत पोहोचलेली ही चर्चा आता संपुष्टात आली आहे.