मुंबई : “शरद पवार सिर्फ नामही काफी है’. महाराष्ट्राचा हा नेता जेव्हा दिल्लीत उभा राहतो तेव्हा दिल्लीलाही झुकावे लागते आणि हे आपण दाखवून दिले आहे, असे राज्यसभेचे खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले.
विधानपरिषदेचे आमदार आणि लोकभारतीचे प्रमुख कपिल पाटील यांनी मुंबईत शिक्षण मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमात राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक करत भाजपवर सडकून टीका केली.
संजय राऊत म्हणाले, पाच वर्षांत भाजपने पाठ्यपुस्तकातले धडे आणि इतिहास बदलला. त्यामुळे आपण सरकार बदलले. लोकशाहीमध्ये यापेक्षा कोणता मोठा धडा असू शकतो? धडे बदलवणाऱ्यांना आपण घरी बसवले, असा टोला त्यांनी लगावला.
कपिल पाटील आम्हाला वाटले स्टेडियम फक्त आम्हीच भरु शकतो. पण मुंबईत शिक्षकांच्या मेळाव्याला स्टेडियम भरले.
हा संगतीचा परिणाम आहे. महाविकास आघाडीच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही उभे आहात, असे ते म्हणाले. सत्ता स्थापनेच्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आशेने डोळे लावून होतो. कपिल जसा पाच वर्ष तुम्ही संघर्ष केला तसा सत्तेत राहून आम्हीही संघर्ष केला, असा खुलासा राऊत यांनी केला.
आता धडा आपण दिला आहे.
त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. शिक्षण क्षेत्र स्वच्छ केले पाहिजे. शिक्षणाची महाराष्ट्राला एक मोठी परंपरा आहे. जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, फतिमा शेख, शाहू महाराज यांची सर्वांची शिक्षणाची परंपरा आहे. स्वत: शरद पवार रयत शिक्षण संस्थेचे प्रमुख आहेत, असे राऊत म्हणाले.