Kesari 2 | Chief Minister Rekha Gupta | अभिनेता अक्षय कुमार, आर माधवन आणि अनन्या पांडे यांच्या ‘केसरी २’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. हा चित्रपट १८ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग पार पडले. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, भाजप खासदार बांसुरी स्वराज, दिल्लीचे मंत्री मनजिंदर सिंग सिरसा आणि मंत्री अनुराग ठाकूर यांच्या विशेष उपस्थितीमध्ये चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग पार पडले. चित्रपट सुरू होण्यापूर्वी अक्षय कुमारने दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची भेट घेतली. चित्रपट पाहिल्यानंतर रेखा गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “चित्रपट पाहताना तुमच्या अंगावर काटा येईल. जालियनवाला बागेत रक्तरंजित बैसाखी कशी साजरी करण्यात आली आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी आपल्या प्राणांचे कसे बलिदान दिले हे दाखवण्यात आले आहे. पण तो इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवला. आम्हाला त्यांची नावेही माहित नाहीत. त्यांच्या बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र देशात मोकळेपणाने श्वास घेऊ शकतो. चित्रपट पाहिल्यानंतर भावनिक झालेल्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आता आपले जीवन पूर्णपणे मातृभूमीसाठी समर्पित करणार असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले. चित्रपटाच्या या विशेष स्क्रीनिंगमध्ये आर माधवन देखील सहभागी झाला होता. तो अक्षय कुमार आणि मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसला. माधवन म्हणाला की, ‘केसरी २’ हा चित्रपट आतापर्यंतच्या सर्वोत्तम चित्रपटांमध्ये समाविष्ट केला जाईल. स्क्रिनिंग दरम्यान, अक्षय कुमारने वकील आणि राष्ट्रवादी सी. शंकरन नायर यांच्या योगदानाची दखल घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान मोबाईल फोन वापरू नका, असे आवाहनही त्याने प्रेक्षकांना केले. याचे कारण म्हणजे हा चित्रपटाच्या गंभीर विषयाचा अपमान ठरेल. अक्षय कुमार आणि आर. यांची प्रमुख भूमिका असलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित केसरी २ हा चित्रपट आहे. या चित्रपटात या दोघांमधील रोमांचक न्यायालयीन लढाई दाखवण्यात आली आहे. ‘केसरी: चॅप्टर २’ १८ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.