मुंबई: आगमीा विधासभा निवडणूकांबाबतची आचारसंहिता येत्या काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठामधील विद्यार्थी परिषदेच्या निवडणूका ऑगस्ट, सप्टेंबर, 2019 मध्ये घेतल्यास कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस विभागावर फार मोठा ताण येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तरी यासंदर्भात विचार करुन सदर विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार हा मंत्रिमंडळाला असावा, अशी दुरुस्ती महाराष्ट्र सार्वनजिक विद्यापीठ अधिनियम 2016 मध्ये करण्यात आली आहे. परंतु या निवडणुका नक्कीच घेण्यात येतील, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज व्यक्त केला.
मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये तावडे यांनी ही माहिती दिली. तावडे म्हणाले, विद्यार्थी परिषदेच्या निवडणूकांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या कुलगुरुंनी यापूर्वी घोषित केले आहे. हे वेळापत्रक घोषित केल्यानंतर स्थानिक जिल्हाधिकारी, स्थानिक पोलीस अधिकारी यांनी या निवडणूकांच्या नियोजनासंदर्भात काही शंका स्थानिक विद्यापीठांच्या कुलगुरुंकडे उपस्थित केल्या. त्या शंका कुलगुरुंनी शासनाकडे पाठविल्या. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी परिषदेच्या निवडणूकांचे वेळापत्रक आगामी विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता असताना येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे विद्यार्थी परिषदेच्या निवडणूका पुढे ढकलण्याची तरतूद महाराष्ट्र सार्वनजिक विद्यापीठ अधिनियम 2016 मध्ये नव्हती. त्यामुळे उपरोक्त परिस्थिती निर्माण झाल्यास अथवा दोन्ही निवडणूकांचे वेळापत्रक एकाचवेळी आल्यास विद्यार्थी परिषदेच्या निवडणूका पुढे ढकलण्याचा अधिकार हा मंत्रिमंडळाला असावा, अशी कायद्यात तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला, त्यानुसार या निवडणूका महाराष्ट्र सार्वनजिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 99(11)(क) बदलाबाबतची अधिसूचना व आदेश निर्गमित करण्यास आज मंत्रिमंडळाने मंजूरी दिली.
महाराष्ट्र सार्वनजिक विद्यापीठ अधिनियम 2016 मध्ये केलेली दुरुस्ती राज्यपालांकडे जाणार आहे. या कायद्याच्या दुरस्तीच्या तरतुदीवर राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.