मुंबई, – एप्रिलमध्ये मुंबईजवळील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्यावेळी चौदा जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल अद्याप सादर झालेला नाही त्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने बुधवारी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो यांनी एका निवेदनात म्हटले आहे की सरकारच्या असंवेदनशीलतेमुळे खारघरला चौदा निष्पान जीव गमावले आहेत हे विसरता येणार नाही.
16 एप्रिल रोजी महाराष्ट्र भूषण सोहळ्यानंतर झालेल्या मृत्यूच्या कारणाची चौकशी करण्यासाठी राज्याने अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) नितीन करीर यांची एक सदस्यीय समिती स्थापन केली होती, परंतु समितीने आता अहवाल सादर करण्यासाठी आणखी एक महिन्याची वेळ मागितली आहे. करीर यांची नियुक्ती घटनेच्या 4 दिवसांनंतर करण्यात आली होती आणि एका महिन्यात अहवाल सादर करायचा होता.
खारघर येथील एका मोकळ्या मैदानात आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात लाखो लोक सहभागी झाले होते. त्यात अनेकांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागला होता. त्यातच अनेकांनी जीव गमावला आहे. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. आता या घटनेला महिना उलटून गेला तरी अहवाल सादर झालेला नाही.
या समितीने आणखी 1 महिन्याची मुदतवाढ मागितली आहे. मुदतवाढीची काय गरज आहे, असा सवाल क्रॅस्टो यांनी केला. या दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे राष्ट्रवादीचे नेते म्हणाले. एखाद्या सरकारी कार्यक्रमादरम्यान उद्भवलेल्या समस्येची एक विद्यमान नोकरशहा कशी चौकशी करू शकतो,असा सवाल क्रॅस्टो यांनी केला. या प्रकरणामुळे शंका निर्माण होते, असेही ते म्हणाले.
या दुर्घटनेचा लोकांना विसर पडावा यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न करत आहे का, असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्र सरकारने अधिक विलंब न करता तपास पूर्ण केला पाहिजे आणि जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असे क्रॅस्टो म्हणाले.