पुणे – कसबा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक हरल्याचे खापर भाजपच्या कसबा निष्ठावानांनी ‘अभाविप’तून भाजपच्या कार्यकारिणीत आलेल्या ब्रिगेडवर फोडली. रविवारी भाजपचे विधानसभेचे उमेदवार हेमंत रासने आणि कसबा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांनी रविवारी कसबा विभागाची बैठक घेतली.
“अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या फळीतून भाजपच्या कार्यकारिणीत आलेल्या कार्यकर्त्यांची “मोनोपॉली’ सध्या पुण्याच्या राजकारणात जास्त आहे. तेच येथील बरेच निर्णय घेतात. भाजपची, निवडणुकांची “ग्राऊंड लेव्हल’ची ज्यांना माहिती नाही अशा नेत्यांनी निवडणूक “हायजॅक’ केली असा आरोप यावेळी भाजपच्या निष्ठावानांनी केला. “ग्राऊंड लेव्हल’ला काम करणारे कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले गेले आणि ते केवळ आदेशाचे धनीच राहिले, अशीही तक्रार या बैठकीत करण्यात आली.
हा आत्मचिंतनाचा विषय असण्यापेक्षा येथे आपण कसे कमी पडलो नाही याचे पाढे वाचण्यात आले. आपण काम केले परंतु ते चारही पक्ष एकत्र असल्याने त्यांचा विजय झाला. आपल्याला चार हजार मते उलट जास्त पडली असे सांगत “गिरे तो भी टांग उपर’ असे दर्शवण्यात आले. याशिवाय आपली चूक नाही असे सांगत कार्यकर्त्यांसमोर मृगजळ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अलिशान, एसी गाड्यांमध्ये फिरणाऱ्या नगरसेवकांविषयीही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्येक बुथप्रमुखाने नगरसेवकाचेच काम केले पाहिजे, जेणेकरून त्याने नागरिकांच्या समस्या नगरसेवकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. येथे पक्षाच्या नगरसेवकांना बुथप्रमुखही माहिती नाही, अशी स्थिती आहे. केवळ अलिशान गाड्यांमध्ये फिरणे योग्य नाही. जमिनीवर चालून, कार्यकर्त्यांना भेटून त्यांची कामे करणे, आवश्यक आहे,
असेही मत काही वरिष्ठ कार्यकर्त्यांनी मांडले.
…अन् फक्त वेळ मारून नेली
आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुढे काय करायचे यावर चर्चा करण्यापेक्षा “निवडणूक हरलो त्यात आपला दोष नाही, विरोधी पक्षच तुल्यबळ होते’ असे सांगून या बैठकीत वेळ मारून नेण्यात आली. त्यामुळे यात “चिंतन’ केले का, आता पुढे काय, हे सगळे प्रश्न अनुत्तरीत राहिल्याचे उपस्थित कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.