Deepika Padukone 40th Birthday: बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आल्या, अनेक सुपरस्टार झाल्या, पण दीपिका पादुकोणचा प्रवास केवळ हिट चित्रपटांपुरता मर्यादित राहिलेला नाही. वैयक्तिक आयुष्यात घेतलेले ठाम निर्णय, सामाजिक विषयांवर निर्भीड भूमिका आणि करिअरमधील धाडसी पावले यामुळे दीपिकाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. म्हणूनच अनेकदा म्हटलं जातं हे फक्त दीपिकाच करू शकते. आज दीपिका पादुकोण आपला ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. नॉन-फिल्मी पार्श्वभूमीतून येऊन बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे. सुरुवातीचा प्रवास प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची कन्या असलेल्या दीपिकाने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओम शांती ओम’ या पहिल्याच हिंदी चित्रपटाने तिला रातोरात लोकप्रिय केलं. शाहरुख खानसारख्या सुपरस्टारसमोरही तिची उपस्थिती ठळक होती. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर ‘बेस्ट फीमेल डेब्यू’ पुरस्कारही मिळाला आणि बॉलिवूडला नवी स्टार मिळाली, हे स्पष्ट झालं. डिप्रेशनवर उघडपणे बोलणारी अभिनेत्री मानसिक आरोग्याबाबत बोलणं ज्या काळात टाळलं जात होतं, त्या काळात दीपिकाने स्वतःला डिप्रेशन झालं होतं, हे निर्भीडपणे मान्य केलं. डिप्रेशन ही कमजोरी नसून आजार आहे, हा संदेश तिने समाजाला दिला. त्यासाठी तिने ‘लिव्ह लव्ह लाफ’ फाउंडेशनची स्थापना करून मानसिक आरोग्याविषयी जनजागृतीही सुरू केली. नातेसंबंध आणि स्वतःची ओळख रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतरही त्याच्या नावाचं टॅटू लपवण्याऐवजी दीपिकाने ते अभिमानाने स्वीकारलं. भूतकाळ लपवण्याऐवजी त्याला सामोरं जाण्याची तिची ही भूमिका चर्चेत राहिली. करिअरच्या शिखरावर असताना विवाह करिअरच्या सर्वोच्च टप्प्यावर असतानाच दीपिकाने रणवीर सिंहशी लग्न केलं. त्या वेळी रणवीरपेक्षा दीपिका अधिक यशस्वी मानली जात होती. मात्र आज दोघेही बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी आणि लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. मातृत्वानंतरही नवी दिशा आई झाल्यानंतर दीपिकाने केवळ ८ तासांच्या कामाच्या शिफ्टची मागणी करून इंडस्ट्रीत नवी चर्चा सुरू केली. ही मागणी फक्त तिच्यासाठी नव्हे, तर काम करणाऱ्या असंख्य महिलांसाठी महत्त्वाची ठरली. ‘माय लाइफ माय चॉइस’ महिलांच्या स्वातंत्र्याबाबतचा ‘माय लाइफ माय चॉइस’ हा तिचा संदेश मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिला. टीका आणि ट्रोलिंग होऊनही दीपिका आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. शाहरुखसोबत यशस्वी जोडी शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांची जोडी प्रेक्षकांची कायमची आवडती ठरली आहे. ‘ओम शांती ओम’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘हॅपी न्यू इयर’, ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांत दीपिकाने केवळ नायिकाच नाही, तर कथेला बळ देणारी भूमिका साकारली. २०२६ मध्ये ही जोडी पुन्हा ‘किंग’ चित्रपटात दिसणार आहे. पुरस्कार आणि जागतिक ओळख दीपिकाने आतापर्यंत चार फिल्मफेअर पुरस्कार पटकावले आहेत. ‘राम-लीला’, ‘पीकू’, ‘छपाक’ यांसारख्या चित्रपटांतील तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. कान्स फिल्म फेस्टिव्हलची ज्यूरी सदस्य ते ‘टाइम’ मासिकातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीपर्यंत दीपिकाने जागतिक स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल केलं आहे. आज दीपिका पादुकोण केवळ एक यशस्वी अभिनेत्री नाही, तर आत्मविश्वास, स्वातंत्र्य आणि धाडसाचं प्रतीक ठरली आहे.