नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा संकट कायम असलं तरी त्यात थोडा दिलासा देणारे आकडे समोर येत आहे. कारण देशभरात मागील 24 तासात 36 हजार 469 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 488 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जुलै महिन्यानंतर देशात पहिल्यांदाच एका दिवसात एवढ्या कमी कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. 18 जुलै रोजी देशात 34 हजार 884 कोरोबाधित आढळले होते. यासोबतच देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूदरातही सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. आता हा मृत्यूदर 1.5 टक्के आहे. आरोग्य मंत्रालायाच्या माहितीनुसार आता 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा मृत्यदर एक टक्क्यापेक्षाही कमी आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 79 लाख 46 हजार 430 आहे. त्यापैकी एक लाख 19 हजार 502 जणाचा मृत्यू झाला आहे. तर 72 लाख एक हजार 70 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 6 लाख 25 हजार 857 जणांवर उपचार सुरु आहे. काल (26 ऑक्टोबर) 63 हजार 842 जण बरे होऊन घरी परतले आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) आज सांगितलं की, देशात 26 ऑक्टोबरपर्यंत एकूण 10 कोटी 44 लाख 20 हजार 894 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी काल 9 लाख 58 हजार 116 जणांची चाचणी केली.