भंडारा – घरात झोपलेल्या अवस्थेत असताना संर्पदंश होऊन दोघा भावंडांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथे घडली. सुशील बलवीर डोंगरे (वय 8 वर्ष) आणि उत्कर्ष बलवीर डोंगरे (वय 11 वर्ष) अशी सर्पदंशाने मृत्यू पावलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. या घटनेने देव्हाडा गावावर शोककळा पसरली आहे.
सुशील आणि उत्कर्ष हे दोघे घरात झोपले होते. त्यावेळी घराच्या मागच्या दारातून साप त्यांच्या बिछान्यावर आला. झोपेत असतानाच दोघा भावंडांना दंश केला. काही तरी टोचल्याचे लक्षात येताच दोघेही झोपेतून उठले. त्यानंतर सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच त्यांना तुमसर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर भंडारा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान उत्कर्षचा रात्री मृत्यू झाला. त्यानंतर सुशीलला भंडारा येथून नागपूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला.