केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळण्यात अडचण
पुणे – लॉकडाऊन परिस्थितीमुळे शासनाने अंत्योदय अन्न योजना व अन्नसुरक्षा योजनेत समावेश नसलेल्या उर्वरित केशरी शिधापत्रिकाधारकांना नोव्हेंबरपर्यंत गहू व तांदूळ वाटपाचा निर्णय घेतला. मे व जून महिन्यात धान्य मिळाले मात्र, आता पुढील धान्य मिळण्यासाठी प्रशासनाला अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
केंद्र शासनाने पुढील महिन्यांसाठी या योजनेला अद्याप मुदतवाढ दिलेली नाही. तसेच केंद्र शासनाने धान्याच्या दरामध्ये प्रति किलो 50 पैसे, तर 1 रुपयाने वाढ केली आहे. तर राज्य शासनाला भासत असलेली आर्थिक चणचण या सर्व कारणांमुळे केशरी रेशनकार्डधारकांना धान्य वाटपाचा तिढा सुटत नसल्याने केंद्र व राज्य शासनाच्या मारामारीत गरीब लोक भरडले जात असल्याचे समोर आले आहे.
करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर केला. त्यावेळी मे व जून महिन्यांकरिता केशरी रेशनकार्डधारकांना गहू प्रति किलो आठ रुपये, तर तांदूळ 12 रुपये प्रति किलो या दराने प्रति व्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ वितरित केला. त्यानंतर राज्य शासनाने ही योजना नोव्हेंबरपर्यंत राबविण्याचा निर्णय घेतला.
लॉकडाऊन काळात या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ नागरिकांनी घेतला. अजूनही आर्थिकचक्र व्यवस्थित सुरू झाले नाही. त्यामुळे नागरिकांना या योजनेची या परिस्थितीत मोठी आवश्यकता आहे.
दरम्यान, ही योजना केंद्र शासनाच्या मदतीने राबविण्यात येत होती. जुलैपासून धान्य वितरण करण्यास केंद्र शासनाने अद्यापही मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे केंद्र शासनाच्या धान्य गोदामातून या योजनेसाठीचे धान्य उचलता येत नाही.
पुण्याचे 9 कोटी रुपये “एफसीआय’कडे शिल्लक
पुणे शहरासाठीचे सुमारे 9 कोटी रुपये केंद्रीय धान्य गोदामाकडे (एफसीआय) शिल्लक आहे. या रकमेनुसारही आवश्यक असलेले धान्यसुद्धा “एफसीआय’कडून मिळत नाही. यासाठी मंत्रालयाच्या स्तरावरून यासाठी पाठपुरावा सुरू असून त्यामध्ये यश येत नाही. पुणे शहरात 4 लाख 60 हजार इतकी केशरी रेशनकार्ड धारकांची संख्या आहे. या नागरिकांना धान्य देण्यासाठी महिन्याला सुमारे 7 हजार 500 मेट्रिक टनाची आवश्यकता भासते. मात्र धान्यच उपलब्ध होत नसल्याने वितरण करता येत नाही.