प्रभात वृत्तसेवा राहू – राहू बेट परिसरात दिवाळी पूर्वीची व आत्ताची सकाळची शैक्षणिक गुणवत्ता यात मोठा फरक दिसून येत आहे.”पदवीधर शिक्षक”च्या गोंडस नावाखाली प्रत्येक शाळेतील एक एक शिक्षक कमी करण्यात आला आहे. त्यामुळे “आधीच उल्हास,त्यात फाल्गुन मास”या म्हणी प्रमाणे फक्त दिवस भरविण्याचे काम चालू आहे. उदाहरणच घ्यावे झाले तर बेट परिसरातील टाकळी येथील सातवीपर्यंत असलेल्या शाळेत बदली पूर्वी आसलेली शिक्षकांची संख्या ही पाच होती. परंतु बदल्या पूर्ण झाल्यानंतर ती एकाने कमी झाली व त्याला पदवीधर शिक्षक उपलब्ध नाही असे नाव दिले गेले. परंतु सातवीपर्यंत असलेल्या या शाळेत आधीच पाच शिक्षक होते,व त्यातही परत एक शिक्षक कमी झाला.म्हणजे आता सात वर्ग हे फक्त चार शिक्षकांनी चालवायचे का ?असा प्रश्न पडत आहे.हीच परिस्थिती शेजारील वडगाव बांडे,पानवली इत्यादी शाळांची व संपूर्ण दौंड तालुक्याची आहे. आधीच मराठी शाळांची गुणवत्ता “वाखाणण्या” जोगी आहे. त्यात असे प्रकार घडत असतील तर मग प्रश्नच मिटला. त्यामुळे शासनाने या गोष्टीवर लक्ष देणे गरजेचे आहे. बदल्या हा प्रशासनाचा अविभाज्य भाग आहे.परंतु बदल्या झाल्यानंतर नगास नग या नियमानुसार काम झाले पाहिजे परंतु तसे होताना दिसत नाही. पुढील काळात मंथन तसेच स्कॉलरशिप व शाळेच्या महत्वाच्या परीक्षा होणार आहेत,त्या पार्श्व भूमीवर विद्यार्थ्यांची कमी वेळात तयारी करणे गरजेचे आहे. ऑनलाईन या नावाखाली घोळ शिक्षक बदल्यांमध्ये ऑनलाइन या शब्दाला खूप मोठे महत्त्व दिले गेले आहे.परंतु या ऑनलाइन नावाखाली मोठे रहस्य दडले आहे की काय असे वाटते.ऑनलाइन जर निःपक्षपातीपणाने काम करत असेल तर नगास नग नुसार का नियम का लागू होत नाही, हा मोठा प्रश्न आहे. वास्तविक पाहता ऑनलाइनच्या नावाखाली सगळी ऑफलाइन सेटिंग चालते की काय? असा प्रश्न सामान्य पालकांना पडत आहे. शिक्षण विभाग काय करतोय? ऑनलाइनच्या नावाखाली सगळाच ऑफलाइन वशिला चालतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे व यंत्रणेवरचा विश्वास उडत चालला आहे. यामध्ये पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने योग्य भूमिका घेऊन योग्य ती न्याय देणे गरजेचे आहे. ऑनलाइन वशिला… जरी प्रशासन कितीही म्हणत असले की ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन व पारदर्शक आहे. तरी बारीक अभ्यास केल्यास असे लक्षात येईल की ठराविक टक्केवारीमध्ये ठराविक शिक्षकांच्या बदल्या या जवळ किंवा त्यांना पाहिजे तेथे झाल्याचे दिसून येत आहे. “आम्ही कमी झालेल्या शिक्षकाची पंधरा दिवस वाट पाहणार आहोत. परंतु पंधरा दिवसात आमच्या शाळेवर कमी असलेला शिक्षक नेमण्यात आला नाही, तर आम्ही निश्चितच आंदोलनाचा पवित्र घेणार आहोत.” – संदीप पांगारकर,अध्यक्ष शालेय शिक्षण समिती,टाकळी भिमा (दौंड)