प्रभात वृत्तसेवा दौंड – शहरालगत असलेल्या लिंगाळी गावाच्या हद्दीतील कल्पतरू अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये असलेली 16 वाहने आगीत भस्मसात झाली असल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अपार्टमेंट मधील रहिवासी हनीफ हमीद तांबोळी यांनी दौंड पोलिसात तक्रार नोंदविली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना (दि.29) रात्री एकच्या दरम्यान लिंगाळी हद्दीतील कल्पतरू अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये घडली. याप्रकरणी झालेल्या प्रकरणाची तक्रार घेण्यात आली आहे. 15 दुचाकी वाहने आणि 1 नॅनो कार जळाली आहे. ही घटना कशामुळे झाली आहे याचा तपास करण्यात येत आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार महेंद्र गायकवाड यांनी दिली. घटनेतील वाहने जळाली आहेत की जाळण्यात आली आहेत, याचा उलगडा झालेला नसल्याने स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश गायकवाड करीत आहेत.