यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत..!!
…जणू अशीच परिस्थिती निर्माण झाली असताना शरद पवार साहेबांच्या रूपाने पुन्हा एकदा ही परिस्थिती बदलून टाकणारा अवतार महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नव्याने जन्माला आला. आणि त्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. अस्वस्थ, अराजक आणि पिळवटून, पिचून गेलेल्या लोकमानसात अंगार फुलवला निखाऱ्यावरची राख झटकली आणि अंगार चेतवला. शरद पवार ही व्यक्ती नव्हे, तर विचार आहे आणि तो एखाद्या वादळाप्रमाणे घोंगावला. तमाम समाजमनाला दिलासा आणि विश्वास दिला.
काय होतं चित्र अवघ्या दोन महिन्यांपूर्वी? धर्मांध शक्ती जणू ताम्रपट घेऊन आल्याच्या थाटात आणि अविर्भावात दंभाने पछाडल्या होत्या, त्या दंभाला उचकटून, विस्कटून टाकण्याचे काम पवार साहेबांनी केले. अगदी एकहाती केले, शरद पवार या शक्तीने ते घडवून दाखवले, जेव्हा सारं संपलं असं वाटतं तेव्हा परिस्थिती कशी बदलायची याचा आदर्श निर्माण केला, लढण्याची जिद्द काय असते आणि या जिद्दीने जिंकायचे कसे असते ते दाखवून दिले. प्रबळ इच्छाशक्तीला सामूहिक स्वरूप दिलं तर काय घडू शकते हेच पवार साहेबांनी दाखवून दिले.
शरद पवार यांच्या लोभस नेतृत्वाकडे आकर्षित होऊन राजकारणात दाखल झालेल्या पिढीचा मी प्रतिनिधी. वयाच्या 25 व्या वर्षी साहेब आमदार आणि अवघ्या 38 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. 1967 साली महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उगवलेलं साहेबांचे नेतृत्व आजही दिमाखाने तळपत आहे. एवढा प्रदीर्घ पट तोही अत्यंत संघर्षमयी तरीही यशस्वी लाभला, नव्हे नव्हे स्वतःच्या कर्तबगारीने निर्माण केला आणि जिंकला तो साहेबांनी. महाराष्ट्राला स्वतःच्या तळहातावरील रेषांप्रमाणे ओळखणाऱ्या साहेबांनी इथला माणूस वाचलाय, इथली परिस्थिती आणि प्रश्न जाणलेत म्हणूनच त्यांच्या हाती या राज्याचा लगाम पुन्हा एकदा हाती आलाय.
साहेबांनी केवळ महाराष्ट्रच घडवला नाही, तर भारत उभारणीत योगदान दिलं आहे. ते योगदान नाकारण्याचा करंटेपणा करणारे कमी नाहीत पण अशांची फिकीर त्यांनी कधीच केली नाही म्हणूनच ते आज एका तेजस्वी सूर्याप्रमाणे तळपत आहेत. फार लांबचे कशाला सांगत बसायचे आपल्या पिंपरी-चिंचवड शहराला घडवण्यात त्यांनी दिलेलं योगदान साऱ्या जगासमोर लख्ख उदाहरण आहे. मातीची मूर्ती, दगडाचा देव करण्याचं काम त्यांनी या शहराचा चेहरामोहरा बदलून केलं… तो चेहरा विद्रुप होणार नाही याची काळजी घेतली, अगदी उदाहरणच द्यायचं म्हटलं तर टाटा कंपनी येथून निघून जातेय की काय अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना साहेबांनीच ती टिकवली, मोठी बिकट व भयानक परिस्थिती त्यांनी मोठ्या कौशल्याने हाताळली, हे फार मोठे उपकार आहेत त्यांचे. अन्यथा त्यावेळी काही उलट घडलं असतं तर आज ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणावर इथं दिसतायत त्या दिसल्या नसत्या.
आज पुण्याच्या तुलनेत वाढलेले हे शहर स्वच्छ पाणीपुरवठा, प्रशस्थ रस्ते, मूलभूत सोयी सुविधा व उड्डाणपुलाचे शहर म्हणून ओळखले जाते ते पवार साहेब व अजितदादांच्या कार्यकर्तृत्वामुळं. झोपडपट्टी पुनर्वसन व घरकुल योजना महाराष्ट्रात कुठेही एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर्णत्वास गेली नाही, ती फक्त या शहराने पूर्ण करून दाखवली, त्याला कारण पवार साहेब यांचं विकासाचं समाजकारण होय. या शहरातील प्रगती भारतातील अन्य शहरांना लाजवेल अशीच झाली आहे. मात्र राजकारणाचे फासे पालटले आणि नको त्या व्यक्तींच्या हातात महापालिकेच्या सत्तेची चावी गेली. महाराष्ट्राला दिशा देणारं हे शहर दुर्दशेच्या गर्तेत बुडालं. कोणतेही विकासाचं काम न करता फक्त महापालिकेची तिजोरी खाली करण्याचे काम इथल्या सत्ताधारी नेत्यांनी केलं. जे आता पवार साहेबांच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण करतायत, त्यांचा तेव्हा जन्म पण झाला नव्हता हे विशेष! सत्ता कोणाकडेही असो पण विकासाची प्रक्रिया थांबता कामा नये, पण गतिमान व सर्वांगीण विकास या शहरात थांबला आहे. इथला नागरिक आज भयानक गर्तेत सापडला आहे. जातीयवादी विचारधारा बाळगणाऱ्या पक्षाच्या नेत्यांनी शहराला किमान 20 वर्ष मागे नेवून ठेवण्याचे पाप केले आहे. त्याला कारणही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांची अनास्था. या सर्वांना पक्षाने पदे दिली ताकद दिली, पण इथल्या नेत्यांनी आदरणीय पवार साहेब व पक्षाला काय दिले, याबाबत विचारमंथन करण्याची वेळ आली आहे. झाले गेले विसरून नव्या जोमाने पुढे येऊन फक्त साहेबांसाठी तरी एकजुटीने पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा नव्याने पक्षाची एक हाती सत्ता आणण्यांसाठी बळ एकवटले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा वाढदिवस साजरा केल्यासारखं होईल. परिवर्तनाची नांदी साहेबांनी सुरू केली आहे. आता गरज आहे ती आपण सर्वांनी पुढे सरसावण्याची. साहेबांचे हात बळकट करण्याची.
अवघ्या महाराष्ट्राने परिवर्तनासाठी साहेबांना प्रचंड प्रतिसाद दिला पण दुर्दैवाने पिंपरी-चिंचवड शहर त्या प्रतिसादात अपेक्षित ताकदीने सरसावले नाही, हे दुर्दैव आपलं. तरीही ही चूक यापुढे नक्की सुधारली जाईल असा विश्वास वाटतो, कारण परिस्थिती बदलणार नाही यावर ठाम राहिलेले, साहेबांनी घडवलेल्या चमत्काराने यापुढे तरी नक्की बदलतील, धीरोदात्त योद्धा असलेल्या साहेबांच्या विचारांची पाठराखण करतील कारण साहेबांचा विचार हा लोककल्याणाचा आहे. म्हणूनच साहेबांची प्रतिमा महाराष्ट्राच्या हृदयात आणि देशाच्या नजरेत सदैव आहे. माझ्या घरातील देव्हाऱ्यात म्हणूनच 3 पिढ्या साहेबांची प्रतिमा पुजली जाते कारण त्यांनी या महाराष्ट्रासोबत या शहराला घडवलं आहे. साहेब तुम्ही शतायुषी व्हा या शुभेच्छा…!
– विलास लांडे, माजी आमदार