लोणावळा, दि. 22 (वार्ताहर) -कामगारांवर झालेल्या अन्यायाविरोधात न्यायालयात दाद मागूनही न्याय मिळण्यासाठी बराच वेळ जातो. त्याचा कामगारांच्या मानसिकतेवरदेखील परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे कामगारांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याकरिता जलदगती कामगार न्यायालये स्थापन करण्यासाठी मी शासनाकडे आग्रह धरणार आहे, असे आश्वासन राज्याचे माजी विरोधीपक्ष नेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिले. तसेच हा मुद्दा मी येत्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
शिवक्रांती कामगार संघटनेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित कामगार मेळाव्यासाठी दरेकर लोणावळ्यात आले होते. यावेळी बोलताना दरेकर म्हणाले, शेतकरी व कामगार हे दोन्ही घटक सशक्त असल्याशिवाय देशाचा गाडा पुढे जाणार नाही. कंत्राटी कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित करणे ही गरज आहे. तसेच सेवानिवृत्त कामगारांचा पेन्शनचा प्रश्न देखील राज्य सरकार मार्गी लावेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस ऍड. विजयराव पाळेकर, भाजपाचे पुणे जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे, शिक्षण समितीच्या माजी सभापती ब्रिंदा गणात्रा, वरिष्ठ चिटणीस गुलाब मराठे, खजिनदार रविंद्र साठे, सीमा पाळेकर, नरेश खोंडगे, प्रतिक पाळेकर, प्रथमेश पाळेकर, यांच्यासह संघटनेचे संघटक व विविध कंपनी व्यवस्थापनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
ऍड. पाळेकर म्हणाले, अनेक बाजारु कामगार संघटना महाराष्ट्रात आल्या आहेत. मात्र 50 कामागारांना सोबत घेऊन स्थापन झालेल्या या संघटनेचे आता पावणेदोन लाख कामगार सदस्य आहेत.
1997 सालापासून औद्योगिक वसाहतींमधील गुंडगिरी मोडीत काढून कामगार व कंपन्या यांना न्याय देण्याचे काम संघटनेने केले आहे. राजकीय इच्छाशक्ती असेल तरच कामगार व शेतकरी यांना न्याय मिळू शकतो असे मत पाळेकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाब मराठे यांनी केल. महादेव वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.