जुन्नर -निसर्ग चक्रीवादळामुळे जुन्नर परिसरात मोठे नुकसान झाले आहे. नाणेघाटात नव्याने उभारलेल्या जंगल कॅम्प हाऊसचे सुमारे 7 ते 8 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी वर्तविला आहे.
यापुढील काळात टेंट हाऊसऐवजी कंटेनर हाऊस उभारण्याची मागणी तेथील युवकांनी तसेच निसर्गप्रेमी नागरिकांकडून होत आहे. परिसराचा विकास, रोजगाराच्या संधी, निसर्गाचे जतन तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. जंगल कॅम्प टेंट्स हाऊसमुळे पर्यटकांची सुरक्षितता वाढून त्यांना निसर्गानंद घेता यावा, हा खरा उद्देश होता.
जानेवारी महिन्यात नवीन संकल्पनेची सुरुवात आमदार अतुल बेनके व वनसंरक्षक जयरामे गौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली होती. मात्र, दोन महिने करोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे टेंट हाऊसचे उद्घाटन होऊनही बंदच होते. त्यामुळे टेंटमधील बरेचसे साहित्य काढून ठेवल्याने इतर साहित्यांचे नुकसान टळले आहे. आता मात्र, पुन्हा एकदा हे जंगल हाऊस उभारण्याचे जुन्नर वनविभाग व घाटघरची वन व्यवस्थापन समिती यांच्यापुढे आव्हान आहे.