प्रभात वृत्तसेवा शिरूर – ‘दैनिक प्रभात’ वृत्तपत्राच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर राज्य मार्ग १०३ शिरूर–पाबळ रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली. मात्र, सुरुवातीला हे काम शासन निर्देशांना डावलून अशास्त्रीय पद्धतीने होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ‘दैनिक प्रभात’ने आवाज उठवला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी काम शास्त्रीय पद्धतीनेच करण्याची ग्वाही दिली आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत सोशल मीडियाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी अनिल जाधव यांनी आपल्या पथकासह जाऊन रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी स्थानिकांनी सुरू असलेल्या कामातील त्रुटी निदर्शनास आणून खराब काम पुन्हा करण्याची, मोठ्या प्रमाणात खराब झालेल्या भागात कारपेटिंग करण्याची, तसेच अशास्त्रीय गतीरोधक हटवून नवे गतीरोधक शास्त्रीय पद्धतीने करण्याची मागणी केली. सहाय्यक अभियंता अनिल जाधव यांनी ठेकेदारांना तातडीने सूचना देत काम शासन निर्देशांनुसार आणि शास्त्रीय पद्धतीनेच होईल, तसेच आवश्यक तेथे शास्त्रीय गतीरोधक बसवले जातील, अशी ग्वाही दिली. यावेळी शाखा अभियंता गाडेकर, कर्मचारी, प्रदीप दासगुडे उपस्थित होते.