Dahivadi Double Murder Case – (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील दहिवडी येथील हृदय हेलावून टाकण्याऱ्या, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये आरोपी अक्षय मांजरे याने समलैंगिक संबंधांना विरोध केल्याने दोन खून केले. केवळ दोन वर्षांच्या अंतराने दोन निष्पाप अल्पवयीन तरुणांचे बळी घेतले होते. दोन्ही मृत्यूमागे एकाच आरोपीचा हात असल्याचे उघड झाल्याने संपूर्ण प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. विशेष म्हणजे, यापैकी एका घटनेत सुरुवातीला “बिबट्याचा हल्ला” असा निष्कर्ष काढला होता; मात्र, तो खून असल्याचे स्पष्ट झाल्याने शिक्रापूर पोलीसांच्या तपास पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन वर्षांपूर्वी दहिवडी येथे ११ वर्षीय तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा प्राथमिक तपास करून हा प्रकार बिबट्याच्या हल्ल्याचा असल्याचे जाहीर केले. पुढे शासनाच्या राजपत्रातही त्यास अधिकृत मान्यता दिली. मात्र, नागरिकांनी त्या वेळीच जखमांचे स्वरूप, घटनास्थळाची स्थिती, साक्षीदारांच्या कथनांमधील विसंगती यावरून संशय व्यक्त केला होता. तरी सखोल तपास करण्याऐवजी प्रकरण निकाली काढण्यावर पोलिसांनी भर दिल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. (दि.२) मार्च रोजी उपविभागीय दंडाधिकारी विठ्ठल जोशी यांनी शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या अहवालाच्या आधारे दोन वर्षांपूर्वी दहिवडी येथे ११ वर्षीय तरुणाचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचे जाहीर केले. मात्र, यात वनविभागाचे म्हणणे विचारात घेतले नसल्याचे वन विभागाने सांगितले. आदेशानंतर पंधरा दिवसांतच (दि.१७) रोजी त्याच परिसरात दुसऱ्या तरुणाचा मृतदेह साम्य असलेल्या परिस्थितीत आढळला. यातून संशय अधिक बळावला. दोन्ही घटनांतील साम्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी अक्षय मांजरे याला अटक केली. त्याने दोन्ही खुनांची कबुली दिली. दोन वर्षांपूर्वी तरुणाचा झालेला मृत्यू हा बिबट्याच्या हल्ल्यामुळे नसून खून असल्याचे स्पष्ट झाले. शिक्रापूर पोलीस चालढकल वृत्तीने दुसरा बळी संपूर्ण प्रकरणात सुरुवातीपासूनच शिक्रापूर पोलिसांनी चुकीची दिशा घेतली होती. घटनास्थळावरील परिस्थिती, जखमांचे स्वरूप, स्थानिकांनी संशय व्यक्त करूनही ‘वन्य प्राण्याचा हल्ला’ असा निष्कर्ष काढल्याने तपास दिशाभूल झाल्याची टीका होत आहे. हा हल्ला नसून बिबट्याचे डिएनए आढळून येत नाहीत, असा हैदराबाद येथील सीसीएमबी वैज्ञानिक प्रयोगशाळेचा रिपोर्ट असतानाही पोलिसांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे उपविभागीय दंडाधिकारी विठ्ठल जोशी यांनी मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचे आदेशित केले होते. मात्र, आता घाईघाईने दिलेला आदेश दुरूस्त करून”हा बिबट्याचा हल्ला नसल्याचे” सुधारित आदेश जाहीर केल्याचे सुत्रांकडून समजते आहे. पोलिसांविरोधात संताप, आक्रोश स्थानिक नागरिकांच्या मते, “पहिल्याच घटनेत कसून तपास झाला असता, तर दुसरा बळी गेला नसता.” या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलीसांच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे शिक्रापूर पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. परिसरात अवैध धंद्यांना मिळणारे अभय, तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप यापूर्वीही झाले आहेत. यापूर्वी एका खुनासारख्या गंभीर गुन्ह्यालाही दडपण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, कर्तव्यदक्ष ‘ खत्री ‘पोलीस कर्मचाऱ्याच्या पुढाकाराने तो प्रकार उघडकीस आला. दीर्घकाळाने गुन्हा दाखल झाला होता. उच्चस्तरीय चौकशीची मागणी जोरात दहिवडीतील दुहेरी हत्याकांडामुळे अनेक अनुत्तरित प्रश्न उपस्थित झाले आहेत. ‘बिबट्याचा हल्ला’ म्हणून प्रकरण बंद करण्याची घाई का केली, तपासातील त्रुटींसाठी जबाबदार कोण, योग्य तपास झाला असता, तर दुसरी घटना टाळता आली असती, असे अनेक प्रश्न उपस्थित होते. चुकीचा तपास करीत अहवाल सादर करणाऱ्यांवर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. “दहिवडी येथे दोन वर्षापूर्वी मुलाचा झालेला मृत्यू हा खून असल्याचे निष्पन्न झालेले आहे. प्रथमत: हा बिबट्याच्या हल्ला असल्याचा संशय व्यक्त झाला होता. मात्र, त्याच परिसरात साम्य असणारी दुसरी घटना घडल्यानंतर तपासात आरोपी मांजरे याने समलैंगिक संबंधांना विरोध केल्याने दोन खून केल्याची कबुली दिली. त्याच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली आहे.” – प्रशांत ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर.