प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 24 -श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदाची घोषणा 15 सप्टेंबरला होणार असल्याचे जाहीर झाले असले तरी या दिवसापर्यंत अध्यक्षपदाचा वाद नक्की मिटणार का, याबद्दल भक्तांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे.
“ट्रस्टचे अध्यक्ष दिवंगत अशोक गोडसे यांना श्रद्धांजली म्हणून त्यांनी तयार केलेला उत्सवाचा आराखडा आम्ही यंदा “फॉलो’ करत आहोत,’ असे स्पष्टीकरण सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत देऊन ट्रस्टींमध्ये सगळे आलबेल असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या आधी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव ऊर्फ तात्या गोडसे गेले; त्यानंतर अध्यक्षपदाची निवड लगेचच करण्यात आली. मात्र, यंदा गणेशोत्सवाच्या तोंडावर “अध्यक्ष’पदाचा वाद उंबऱ्याबाहेर आणायचा नाही म्हणून अशोक गोडसे यांना श्रद्धांजली म्हणून हा उत्सव पार पाडणार, असे जाहीर करण्यात आले.
गोडसे यांनी ठरवलेला आराखडा नव्याने होणारा अध्यक्ष पूर्ण करणार नाही का, त्यासाठी अध्यक्षपद रिक्त का ठेवायचे, अध्यक्ष नसल्याने ट्रस्टतर्फे चालवण्यात येणाऱ्या प्रकल्पांची कामे थांबल्यास त्याचे काय, त्याला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न विचारले जात आहे.
महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश-विदेशांतून या बाप्पाला देणग्या येतात. या देणग्या, याचा कारभार, उपक्रम, त्या संबंधातील निर्णय या सगळ्या गोष्टींवर गेल्या सात महिन्यांत, किंबहुना त्या आधीपासूनच बराच वेळ गेला आहे. सुवर्णयुग बॅंकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जर बिनविरोध होत असेल, तर ही का नाही केली जात, याविषयीही भक्तांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
उत्सवात शक्तिप्रदर्शन दिसणार का?
अध्यक्षपदाची धुसफूस ही गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेच. त्यातून विश्वस्त मंडळ 14 ऐवजी 11 सदस्यांचेच ठेवणार असल्याचेही सोमवारच्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. अध्यक्षपदासाठी सध्या सुंदोपसुंदी आहेच; परंतु उरलेल्या तीन सदस्यांबाबतची मारामारीही आता लपून राहिली नाही. त्यामुळे त्या तीन पदांचे काय? याबाबतही भक्तांकडून विचारणा केली जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या जागांवर आपणच कसे योग्य आहोत, हे सांगण्यासाठी उत्सवात इच्छुकांचे एक प्रकारे शक्तीप्रदर्शन किंवा कुरघोडी दिसणार आहे का, याबाबतही भक्तांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.