पुणे – जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. आता शुक्रवारी (दि. 29) जिल्हा परिषदेत “दादां’ची शाळा भरणार असल्यामुळे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. करोनामुळे वर्षभर “ऑनलाइल शिक्षण’ (व्हिसीद्वारे बैठका) सुरू होत्या, आता प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक घेणार असल्यामुळे “गृहपाठ’ (विभागाच्या माहितीचे पीपीटी) तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची लगबग सुरू दिसून आली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या आणि दोन महिन्यांतच करोना प्रादुर्भावामुळे सर्व जग थांबल. संचारबंदी आणि करोनाच्या संकटात निधी नाही, विकासकामे नसल्यामुळे पदाधिकारी करोनाच्या कामातच अडकले. आता विकासकामांना सुरुवात झाली असून, निधी मिळण्यास सुरुवात झाली आहे.
मात्र, नवीन पदाधिकाऱ्यांकडे आता केवळ अकरा महिने राहिले. या अकरा महिन्यांत जिल्ह्याच्या विकासकामाला गती देणे हीच पदाधिकाऱ्यांची खरी परीक्षा आहे. त्यासाठी स्वत: उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत जिल्हा परिषद कामकाजाचा आढावा घेणार आहे.
पवार यांच्या कामाची पद्धत लक्षात घेता, सर्व विभागांकडून माहिती गोळा करून त्याचे सादरीकरण करण्याची तयार दिवसभर सुरू होती. यावेळी पूर्व उच्च प्राथमिक/पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षातील यशस्वी विद्यार्थ्यांना पवार यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.
त्यामध्ये इयत्ता पाचवीतील 58, तर इयत्ता आठवीतील 48 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित असणार आहेत.