मुंबई : राज्यात शिक्षण क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आता लवकरच विद्यार्थ्यांना पहिली पासूनच स्थानिक सैनिकी शिक्षण दिले जाणार आहे. माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, एनसीसी आणि स्काऊट गाईडचे शिक्षक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. तसेच सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. दादा भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण व्हावी तसेच राष्ट्र प्रथम हा विचार रुजविण्याच्या उद्देशाने इयत्ता पहिलीपासूनच सैनिकी शिक्षणाचे प्राथमिक स्तरावरील प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. यामध्ये माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, एनसीसी तसेच स्काऊट गाईडचे शिक्षक हे विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचे धडे देणार आहेत. विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण देण्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसेच, मंत्री शंभुराज देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. नुकतेच जिल्हा परिषदेच्या 48 शिक्षकांना सिंगापूर येथे अभ्यास दौऱ्यासाठी पाठवण्यात आले होते. तेथील शिक्षण व्यवस्थेमध्ये राष्ट्र प्रथम ही संकल्पना असल्याचे शिक्षकांनी सांगितले. महाराष्ट्रामध्येही शालेय शिक्षणात आमूलाग्र बदल करत आहोत. शिक्षणातून देशप्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणात बदल दिसून येण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. शालेय विद्यार्थ्यांची सहल शेतकऱ्यांच्या बांधावर घेऊन जाणार आहे. बळीराजा कशा प्रकारे कष्टाने पिकवतो? याची जाणीव त्यांना या माध्यमातून होईल. तसेच सहल बँकेत, रुग्णालयासह इतर विविध ठिकाणी घेऊन जाताना तेथील व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. त्यांना या माध्यमातून होईल. तसेच सहल बँकेत, रुग्णालयासह इतर विविध ठिकाणी घेऊन जाऊन त्यांच्यापर्यंत गौरवशाली इतिहासाची माहिती पोहचवली जाणार आहे, असेही ते म्हणाले.