- श्रीनिवास वारुंजीकर
पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करायला पाहिजे, हे सगळ्या जणांना माहिती असते; पटतही असते. मात्र, त्यासाठी व्यक्तिगत पातळीवर काय करायचे याची कुठेही स्पष्टता असत नाही. एक माणूस करून करून काय करणार आणि आभाळ फाटलेल्या पर्यावरणाच्या वस्त्राला संरक्षणाची ठिगळे तरी किती लावणार, असाच सूर नेहमी उमटताना दिसतो. मात्र, तेव्हाच्या दक्षिण सातारा जिल्ह्यातील (आताच्या सांगली) निसर्गमित्र धों. म. मोहिते या एका माणसाने एकट्याच्या बळावर एका अभयारण्याची निर्मिती करून उजाड आणि दुष्काळी भागाचे नंदनवनात रूपांतर कसे केले, त्याची ही प्रेरणादायी कहाणी…
जीवसृष्टी ही आपला अधिवास स्वत: शोधत असते आणि त्यांना अनुकूल अशा पारिस्थितीमध्ये सर्वच सजीव आपल्या आयुष्याचे मार्गक्रमण करत असतात. त्यासाठी कृत्रिमरीत्या काही करता येत नाही, हे जरा मुळापासून समजून घेणे आवश्यक आहे. जर असे जैवविविधता उद्यान खरेच साकारायचे असेल तर आपल्याला सागरेश्वर अभयारण्याच्या कर्मयोग्याच्या जीवनाची थोडीबहुत माहिती करून घेणे आवश्यक आहे. केवळ एका माणसाची इच्छाशक्ती आणि त्याच्या सातत्याने पाठपुराव्याला आलेले यश म्हणजे सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर काळवीट अभयारण्य होय. एक खऱ्या अर्थाने असलेले जैवविविधता उद्यान म्हणजेच हे अभयारण्य आहे.
तत्कालिन दक्षिण सातारा जिल्ह्याचा पूर्वभाग म्हणजे दुष्काळाच्या झळा वर्षानुवर्षे सोसणारा भाग. वास्तविक महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कृष्णा नदीच्या खोऱ्याचा हा परिसर. मात्र, सिंचनाच्या नियोजनाच्या अभावाने सातत्याने अवर्षणग्रस्त भाग. केवळ पशुधनावर गुजराण करणारे नागरिक. म्हणजे इकडे गावांची नावे सुद्धा बघा दुधारी, दह्यारी, ताकारी, तुपारी आणि लोणारी अशी दुग्धजन्य पदार्थांचीच.
अशातच आताच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव आणि पलुस (संगीततज्ज्ञ विष्णु दिगंबर पलुसकरांचे मूळ गाव) या तालुक्यांच्या सीमेवर एका खेड्यात जन्मलेल्या धोंडिबा मोहिते या युवकाला दुष्काळाच्या झळा सोसवेनात आणि त्यापायी होणारे गावकऱ्यांचे हालही पहवेनात. सातारा जिल्ह्याच्या अतिपूर्वेकडून म्हणजेच माणदेशातून येणारे धनगरांचे तांडे आणि सोबत शेळ्या-मेंढ्यांचे कळप पाहून, आपण याच भागात पाण्याची चांगली सोय केली पाहिजे, असे मोहिते यांच्या मनाने घेतले.
पाणी मुबलक हवे असेल, तर झाडांची संख्या वाढली पाहिजे असे गावातीलच एका बुजुर्गाने मोहिते यांना सांगितले, त्यामुळे आपण या वैराण माळरानावर जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत, असे मोहिते यांनी ठरवले. ज्यावेळी गावच्या चावडीवर त्यांनी हा विषय बोल्लोन दाखवला, त्यावेळी सगळ्यांनी मोहितेंना वेड्यात काढले. म्हणाले, “अरे झाडे जगवायला तरी पाणी कुठून आणशील?’
मात्र मोहिते निराश झाले नाहीत. त्यांनी यासाठी सरकारदरबारी पाठपुरावा करायचा, असे ठरवले. मोहिते त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे काम करत असत. शेतकरी बांधवांच्या हितासाठी काय करता येऊ शकेल, असा विचार ते सातत्याने करत, त्यामुळे परिसरातील शेतीला पाणी द्यायचे असेल, तर जलसंधारण केले पाहिजे, भूजल पातळी वाढवायची असेल, तर वृक्षारोपण केले पाहिजे, याची त्यांना खात्री पटली.
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे जन्मगाव देवराष्ट्रे हे सागरेश्वराच्या डोंगराच्या कुशीतलेच एक गाव. त्यावेळी सागरेश्वराचा सगळा डोंगर उघडा-बोडका असाच होता. शेजारून जाणारी रेल्वेलाइन आणि दूरवरून शांतपणे वाहणारी कृष्णामाई, असा तो परिसर. अशातच मोहित्यांचे वडगाव हे गाव.
मग मोहितेंनी राज्याच्या वन खात्याला पत्र लिहून वृक्षारोपणासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. गावकऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून सांगायला सुरुवात केली, त्यासाठी मोहिते शेतकऱ्याला त्याच्या शेतात जाऊन भेटू लागले. बांधावर बसून फडक्यात गुंडाळून आणलेली मीठ-भाकर खाता खाता मोहितेंचे समाजप्रबोधनाचे काम सुरू झाले.
मात्र, कोणत्याही नव्या संकल्पनेची ज्याप्रमाणे सुरुवातीला थट्टा होते, तसाच अनुभव मोहितेंना येत गेला. एखादा अशी थट्टा-मस्करी पाहून निराश झाला असता आणि त्याने असा जगावेगळा नाद सोडून दिला असता. मात्र, जितकी थट्टा जास्त होत गेली, तितका मोहितेंचा निर्धार अधिक कडवा होत गेला.
कुणीतरी मोहितेंना सांगितले की- अरे, आपल्या देवराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण आता केंद्रात मंत्री आहेत. त्यांना जाऊन भेट ना. त्यावेळी खरेच यशवंतराव केंद्रात संरक्षणमंत्री होते; पण यशवंतराव कॉंग्रेसचे आणि मोहिते शेतकरी कामगार पक्षाचे; कसे जमणार?
तरीही एक दिवस मनाचा हिय्या करुन मोहितेंनी यशवंतराव चव्हाणांन एक पत्र लिहिले. ते पत्र वाचून यशवंतरावांनी मोहितेंना दिल्लीला बोलावले. तिथे मोहितेंनी आपली अभयारण्याची संकल्पना समजावून सांगितली. आपल्या भागातला एक सद्गृहस्थ पंचक्रोशीच्या भल्यासाठी काही करतो आहे, हे समजून यशवंतरावांनीही पक्षीय भेद दूर सारत, त्यांना मदत करण्याचे ठरवले.
मोहिते गावाकडे परत आले आणि शासकीय यंत्रणेची चाके भराभरा फिरू लागली. यशवंतरावांनी राज्याच्या वन खात्याला एक पत्र पाठवले आणि वन खात्याचे लोक मोहितेंचे घर शोधत त्यांच्या घरी आले. अशा प्रकारे अखेर 21 ऑगस्ट 2971 रोजी धोंडीबा मोहिते यांच्या हस्ते पहिल्या झाडाचे वृक्षरोपण करुन सागरेश्वर अभयारण्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. आज देशातीले एकमेव मानवनिर्मित अभयारण्य अशी या अभयारण्याची ओळख आहे, हे विशेष.
कऱ्हाड सांगली रस्त्यावर सांगलीपासून 30 कि. मी. अंतरावर सागरेश्वर काळविट अभयारण्य असून, ते 10 चौ. कि. मी. क्षेत्रात पसरले आहे. येथे सागरेश्वराचे देवालय असून, सागरेश्वराच्या नावानेच तिथे देवराई आहे. या अभयारण्यात शिसम, ऐन, किंजळ, चिंच, कडुनिंब, निलगिरी, खैर, पळस, बांबू अशी विविध वृक्षराजी आढळते. सामीसदाहरित (सेमीग्रीन) अशा प्रकारचे हे जंगल असून, येथे साळींदर, काळविटे, सांबर, ठिपक्यांचे चितळ, ससे, अस्वले, तरसे, गवे, कोल्हे असे प्राणी तर मोर, नीलकंठ, खंड्या, होला, बुलबुल असे पक्षी, अजगरासह विविध सर्पही आढळतात.