हिमांशू
सोशल मीडियाशी आमची काही व्यक्तिगत खुन्नस नाही. तशी ती असण्याचं कोणतंही सबळ कारण आमच्या दृष्टिपथात नाही. परंतु लोकांना बुद्धी गहाण ठेवायला लावणाऱ्या कोणत्याही गोष्टीबद्दल हिताच्या चार गोष्टी सांगणं भाग पडतं. त्यामुळं कोणताही सोशल प्लॅटफॉर्म आमचं म्हणणं पर्सनली घेणार नाही, अशी खात्री बाळगतो.
स्मार्टफोन आल्यामुळे आपणच स्मार्ट झाल्यासारखे आपल्याला वाटत असलं, तरी “संतोषी मातेची पत्रं दहा लोकांना पाठवा,’ अशा मानसिकतेत आपण असताना हे नवमाध्यम आपल्याला भेटलं, हे वास्तव नाकारण्याजोगं नाही. अर्थातच, जे पत्रांद्वारे होत होतं तेच सोशल प्लॅटफॉर्मवर सुरू झालं. निंदानालस्ती, गॉसिप, व्यक्तिमत्त्व पूजा किंवा व्यक्तिमत्त्वाची हानी करणाऱ्या कानगोष्टींना एक जलद माध्यम मिळालं. तेही एक वेळ मान्य करता येईल. नाही तरी “आम्ही ट्रोलिंग एन्जॉय करतो,’ असं म्हणणारी माणसं भेटू लागलीच आहेत. एरवी समोरासमोर कुणी एखादा वाकडा शब्द बोललेलं ज्यांना सहन होत नाही, तीच माणसं ट्रोलिंग एन्जॉय करतात, हे विशेष! पण जेव्हा हे नवमाध्यम आर्थिक, सामाजिक आणि कधीतरी जीवाचं नुकसान करू लागतं, तेव्हा बोलावं लागणारच. एखादं संकटसुद्धा माणसं “संधी’ समजून वापरू लागतात, तेव्हा इतरांना सावध करावं लागणारच. चीनमधून जगभर पसरू लागलेला करोना विषाणू हा खरंतर अत्यंत गंभीर विषय. पण सोशलवीरांनी हीसुद्धा “संधी’ मानावी, हे अनाकलनीय आहे.
करोना विषाणूचा फैलाव चिकन आणि अंड्यांच्या माध्यमातून होतो, अशी अफवा सोशल माध्यमांतून पसरवली गेली आणि गहजब झाला. आधीच मंदीनं हैराण असलेल्या आपल्या देशात चिकन आणि अंड्यांचा व्यवसाय ठप्प झाला. अशा अफवा आम्हाला राशीभविष्यासारख्या वाटतात. “बिलकूल विश्वास नाही,’ असं म्हणणारी माणसंही राशीभविष्याकडे नकळत आकर्षित होत असतात. विश्वास नसला तरी “उगाच रिस्क कशाला,’ असाच भाव त्यामागे असतो. त्याचप्रमाणं करोना विषाणू अंड्यांमार्फत पसरतो, यावर विश्वास नसला तरी लोक अंडी खाणं टाळू लागले. परिणामी, राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये या व्यवसायाचं आणि व्यावसायिकांचं अतोनात नुकसान होऊ लागलं. उलाढाल मंदावली. आता हे नुकसान कोट्यवधींच्या घरात पोहोचलंय. असत्य जेव्हा सोशल मीडियासारख्या गतिमान माध्यमातून समाजात पसरत जातं, तेव्हा सत्य समोर येऊनसुद्धा फारसा उपयोग होत नाही, हा अनुभव आहे. असत्याच्या मागून येऊन सत्य पुढे जाऊ शकत नाही.
शिवाय, समाजाला सत्य समजलं तरी तोपर्यंत झालेलं नुकसान भरून येत नाही. कुक्कुटपालन व्यवसाय मुळातच अडचणीत असताना पोल्ट्रीतून अंडी बाहेर पडेनाशी झाली. बाजारातला खप निम्म्याहून अधिक घसरला. अफवा पसरवणारे गालातल्या गालात हसत असतील; पण त्यामुळे झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण?
राज्यात मध्यंतरी मुलं पळवणारी टोळी आल्याच्या अफवा वाऱ्यासारख्या पसरल्या. अनोळखी लोकांना बेदम मारहाण होऊ लागली. अनेकांनी मारहाणीत जीव गमावला. त्यांची कुटुंबं रस्त्यावर आली. एवढं होऊनसुद्धा हातातल्या मोबाइलवर आलेली माहिती हा खोडसाळपणा असू शकतो, एवढा विचार करण्याचा विवेक कुठे गेला, कोण जाणे! “जे-जे आपणासी आले, ते-ते पुढे ढकलले’ या न्यायाने आपण अनेकांचे नुकसान करू शकतो, हे जाणण्याचे आणि हा चक्रव्यूह भेदण्याचे बळ आपल्याला वेळीच येवो!