नवी दिल्ली – भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने जागतिक मैदानी स्पर्धेत नुकतेच रौप्यपदक जिंकत पुन्हा एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या पदकासह नीरजने तब्बल 19 वर्षांनंतर देशाला आणखी एक पदक जिंकून दिले. मात्र, या स्पर्धेतील अंतिम सामन्यादरम्यान भालाफेक करताना चौथ्या प्रयत्नानंतर निरजच्या मांडीला दुखापत झाली.
याबाबत सामन्यानंतर नीरजने गंभीर त्रास होत असल्याची तक्रार केली होती. सोमवारी एमआरआय केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला एक महिना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धा दोन दिवसांवर आली असताना नीरजला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा येत्या 28 जुलै ते 7 ऑगस्टपर्यंत खेळली जाणार आहे.
बर्मिंगहॅम येथे गुरुवार, दि. 28 जुलैपासून राष्ट्रकुल स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या जागतिक स्तरावरील स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार भालाफेकपटू आणि पदकाचा प्रबळ दावेदार नीरज चोप्राने कंबरेच्या दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतली आहे. याबाबत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी माहिती दिली.
याबाबत अधिक माहिती देताना आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी सांगितले की, भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राचा आज सकाळी मला अमेरिकेतून फोन केला होता. दुखापत झाल्याने आपण बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत खेळू शकणार नाही, अशी माहिती त्याने दिली. रविवारी पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेतल्यानंतर नीरज चोप्रा याचे सोमवारी एमआरआय स्कॅन करण्यात आले. त्या आधारावर डॉक्टरांनी त्याला एक महिन्याच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला म्हणाले, चोप्रा यांच्या पुनर्प्राप्तीसाठी मदत करण्यासाठी त्यांच्या संपर्कात आहेत. तो राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सहभागही होण्यासाठी 100 टक्के तंदुरुस्त नाही. यामुळे तो उद्घाटन समारंभात ऍथलीट्सच्या परेडमध्ये भारतीय दलाचा ध्वज वाहक असणार नसल्याचेही सुमारीवाला यांनी स्पष्ट केले.
दुखापतीने चिंता वाढवली
भारताचे प्रतिनिधित्व करणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा सातत्यानं चांगली कामगिरी करून दाखवत आहे. गेल्या महिन्यात 2022चा हंगाम सुरू करणाऱ्या नीरजने तीन स्पर्धांमध्ये दोनदा राष्ट्रीय विक्रम मोडला. त्याने फिनलंडमधील पावो नुर्मी गेम्समध्ये रौप्यपदक जिंकून राष्ट्रीय विक्रम मोडून हंगामाची सुरुवात केली. त्यानंतर क्युर्टेन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले. तसेच स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये 89.94 मीटर भाला फेकून दुसरा क्रमांक पटकावत पुन्हा राष्ट्रीय विक्रम मोडला. त्यानंतर नुकतीच पार पडलेल्या जागतिक मैदानी स्पर्धेत रौप्यपदक जिंकून 19 वर्षांची प्रतीक्षा संपवली. तसेच राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याच्याकडून भारताला मोठी अपेक्षा होती. परंतु, दुखापतीमुळे त्याला स्पर्धेला मुकावे लागल्याने भारताची चिंता वाढली आहे.