जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पर्यटकांकडून उल्लंघन
पवनानगर – पुणे जिल्ह्यातील करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पुणे जिल्ह्यासह मावळ तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळे वर्षाविहारासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तरीसुद्धा पावसाळ्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मावळ परिसरात रविवारी (दि. 14) पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.
पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या यांच्यासह गडकिल्ले आणि पवना धरण परिसरात पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या वेळी “फिजिकल डिस्टन्सिंग’ नियमाचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले. परिसरात करोनाचे पेशंट मिळत असल्याने परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
वर्षाविहारासाठी आलेल्या करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच पर्यटनासाठी आलेले अनेक हुल्लडबाज पर्यटक वाहतुकीच्या नियमाचे पालन न करता वाहन चालवत होते. यातून अपघात देखील घडण्याची शक्यता असल्याचे मत सुजाण नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
एकीकडे मावळ तालुक्यात करोनाने थैमान घातले आहे. रोज करोनाबाधित रुग्ण आढळत असताना देखील दुसरीकडे तालुक्यातील पर्यटन स्थळावरील नागरिकांची गर्दी देखील वाढत आहे. यामुळे मावळातील करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. पर्यटकांच्या गर्दीला वेळीच अटकाव घालावा, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.