मुंबई – करोनाच्या संकटामुळे जगाची अन्नधान्याची गरज बदलणार आहे. हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिके घेतली जातील यादृष्टीने पुढील काळासाठी आखणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच पीक कर्जाबाबत रिझर्व्ह बॅंकेकडे सातत्याने पाठपुरावा करीत असून राज्यातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी त्यांनी ग्वाही दिली.
राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख आदी उपस्थित होते. तर प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांसह व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
ठाकरे म्हणाले, धोक्यात आलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी कृषी क्षेत्र महत्त्वाची महत्वाची भूमिका बजावेल. करोनाचे संकट लक्षात घेता अन्नधान्याच्या दृष्टीने बाजारपेठेचा अंदाज घेऊन राज्यातील शेतकऱ्यांनी पावले उचलणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
करोनानंतर जग बदलणार आहे. अर्थातच त्यात कृषी क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी दर्जेदार पिकं घेऊन मोठ्या प्रमाणावर निर्यात कशी होईल हेही पाहिले पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. खरीप हंगामासाठी राज्यात बियाणे, खतांची उपलब्धता असून शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादन घ्यावे. पीक विमा योजनेबाबत केंद्र शासनाबरोबर चर्चा सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, करोनामुळे राज्यासमोर आर्थिक संकट आहे. त्यामुळे आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलीस, अन्न व नागरी पुरवठा यासारख्या विभागांना निधी देण्याचे प्राधान्य असून त्यामध्ये कृषी विभागाचाही समावेश केला जाईल. करोनाचा मुकाबला करताना कृषी क्षेत्र आपल्याला आर्थिक संकटातून बाहेर काढू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात तातडीने कापूस, ज्वारी, मका, धान खरेदीसाठी गती द्यावी आवश्यक तेथे खरेदी केंद्र वाढवावीत, अशी सुचना देखील केली.
युरियाचा अतिरिक्त साठा
खरीप हंगामासाठी खते, बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले असून आतापर्यंत 18 हजार शेतकरी गटांच्या माध्यमातून 60 हजार मेट्रिक टन खते, 20 हजार क्विंटल बियाणे दीड लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले आहे. तसेच सोयाबीनसह कुठलेही खते आणि बियाणे कमी पडू दिले जाणार नाही. राज्यात सोयाबीन उबवण क्षमतेचे 63 हजार प्रयोग झाले असून शेतकऱ्यांना घरातील सोयाबीन बियाणे वापरण्याचे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
राज्यात युरियाचा 50 हजार मेट्रिक टन अतिरिक्त साठा करून ठेवण्यात आला आहे. या हंगामात 25 हजार शेतीशाळा घेण्याचे नियोजन केले असून त्यात 25 टक्के शेतीशाळा महिलांच्या असतील. सिक्कीमच्या धर्तीवर राज्यात सेंद्रिय शेतमाल प्रमाणीकरणास मान्यता देण्यात आली आहे.