Crop Damage – आरफळ कालव्याचे पाणी अखेर सोडण्यात आले असले तरी प्रशासनाच्या नियोजनशून्य आणि मनमानी कारभारामुळे मसूर पूर्व भागातील शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे कामच झाले असल्याची संतप्त प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे. कालव्याला पाणी आले, राजकीय श्रेयवाद झाला, चौकात जल्लोषही झाला. मात्र, प्रत्यक्षात शेवटच्या शेतकर्याच्या बांधापर्यंत अद्याप पाणी पोहोचलेले नाही. परिणामी पिके करपून गेलेल्या शेतकर्यांसमोर आता पाणी दिसतंय पण मिळत नाही, अशी वेदनादायी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांच्या ढिसाळ, बेजबाबदार आणि नियोजनशून्य कारभारावर संताप व्यक्त होत आहे. एवढ्या गंभीर परिस्थितीत एकही ठोस नियोजन बैठक घेण्यात आली नाही. कोणत्या गावाला किती पाणी द्यायचे, कोणत्या पोटपाटाला किती वेळ पाणी सोडायचे, शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी काय उपाययोजना करायच्या याचे कोणतेही स्पष्ट नियोजन प्रशासनाकडे नव्हते. परिणामी कालव्यात पाणी आले तरी त्याचे व्यवस्थापन कोलमडले. अधिकार्यांच्या नियोजनशून्य कारभाराने शेतकर्यांच्या घामावर पाणी फिरवले असल्याचे आरोप होत आहेत. यातच कालव्याच्या पाटात ट्रक पडल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आणि एक संपूर्ण रोटेशन वाया गेले. या कालावधीत प्रचंड उन्हामुळे ऊसासह अनेक पिकांनी अक्षरशः मान टाकली. विहिरी कोरड्या पडल्या. अनेक शेतकर्यांनी मोटारी बंद ठेवल्या. पाण्याअभावी हजारो एकर क्षेत्रावरील पिके करपून गेली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आता पाणी आले असले तरी परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर पाणी आल्याने शेतकर्यांमध्ये पाणी पाजण्यासाठी चढाओढ लागली आहे. पिकांचे नुकसान (संग्रहित छायाचित्र) आधी माझ्या शेताला पाणी द्या, यासाठी अनेक ठिकाणी वाद निर्माण होत आहेत. काही भागात पाटाला पाणी दिसत असले तरी पोटपाटापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने शेवटच्या टोकावरील शेतकरी हतबल झाले आहेत. अधिकार्यांनी मोठ्या प्रमाणात फ्यूजा काढून नेल्याने पाण्याचा प्रवाह विस्कळीत झाला. परिणामी मुख्य कालव्यातून पाणी सोडले जात असले तरी अनेक पोटपट कोरडेच पडले आहेत. हक्काचे पाणी डोळ्यासमोरून वाहताना दिसते, पण शेतीपर्यंत येत नाही, अशी संतप्त भावना अनेक शेतकर्यांनी व्यक्त केली. परिस्थिती हाताबाहेर जात असताना देखील प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी यंत्रणा उभी करण्यात आलेली नाही. ना अधिकारी प्रत्यक्ष शेतकर्यांमध्ये दिसत आहेत, ना पाणी वाटपावर नियंत्रण आहे. उलट शेतकरीच स्वतःच्या जीवावर पाणी अडवणे, वळवणे आणि पिके वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. याला जबाबदार कोण? शेतकर्यांची पिके करपली, लाखोंचे नुकसान झाले याला जबाबदार कोण, असा सवाल शेतकर्यांमधून विचारला जात आहे. वेळेवर नियोजन झाले असते, नियमित बैठक घेतल्या असत्या, अनधिकृत पाणीउचल रोखली असती आणि रोटेशन शिस्तीत चालवले असते तर आज ही परिस्थिती उदभवली नसती, अशी भावना परिसरात तीव्रतेने व्यक्त होत आहे. वर्षभराची पाणीपट्टी घेत असतानाही व हक्काचे पाणी असतानाही शेतकर्यांना पाणी मिळत नाही ही वेदनादायक बाब असून लोकप्रतिनिधींनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. या सर्व बाबींची तातडीने चौकशी करून बेजबाबदार अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.