पाच लाख हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त
नवी दिल्ली : राजस्थानसह अनेक राज्यात टोळधाडीने गंभीर स्थिती निर्माण केली आहे. सुमारे पाच लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांची धूळधाण केली आहे.
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात यावर्षी टोळधाडीमुळे आणीबाणी जाहीर करावी लागली होती. तेथून हे टोळ आले असावेत, अशी शक्यता आहे. या टोळधाडीने अनेक प्रांतात प्रवेश केला आहे. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात या समस्येचे मोठे आव्हान उभे राहीले आहे. या राज्यातील अनेक पिके उद्ध्वस्त झाली आहेत.
सुमारे पाच लाख हेक्टरवरील पिके त्यांनी फस्त केली असावीत, अशी शंका आहे. यातील बहुतांश भाग हा पूर्व आणि पश्चिम राजस्थानातील आहे. श्री गंगानगर, जैसलमेर, बारमेर, बिकानेर, जोधपूर, आणि दौसा जिल्ह्यात त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. राजस्थानमध्ये तीन महिन्यांपासून टोळधाडीने शेतकऱ्यांचे जीणे मुश्कील झाले आहे.
“मी रब्बी पिकासाठी नऊ लाख रुपयांचे कर्ज घेतले. टोळधाडीने सारे पीकच नष्ट झाले… हे कर्ज मी फेडू कसे?
-जसकरणसिंह ,शेतकरी(राजस्थान)
राजस्थानच्या पश्चिम भागातील श्री गंगानगर, बिकानेर आणि बारमर जिल्ह्यात या टोळांनी शेतातील रब्बीचे संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले आहे. राज्यातून या टोळांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांना नियुक्त करून राज्य सरकारने मोहीम हाती घेतली आहे. मात्र त्यावर तातडीने नियंत्रण मिळवणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे.