मुंबई – विधानभवनाच्या लॉबीत आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या गोंधळानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कठोर भूमिका घेत, “उद्या अहवाल मिळताच फौजदारी कारवाई केली जाईल,” असा इशारा दिला आहे. गोंधळाच्या घटनेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोपीचंद पडळकर यांना बोलावून घेतले. त्यानंतर पडळकरांनी माध्यमांसमोर दिलगिरी व्यक्त केली. “घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मला याचे अतिशय दुःख असून मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे ते म्हणाले. मात्र, अधिक प्रतिक्रिया देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. खुद्द मुख्यमंत्री व गृहमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडे योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली. “विधानभवन परिसरातील घटना दुर्दैवी आहे. या प्रकरणाचा अहवाल उद्या मिळणार असून, त्यानुसार संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. माझ्या अधिकारात असलेल्या तरतुदींनुसारही कठोर पावले उचलली जातील,” असे अध्यक्ष नार्वेकर यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गुंडांना पास देणाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.