शिक्रापूर -करंदी (ता. शिरूर) येथे चासकमान कालव्यावर हक्काचे पाणी मिळण्यासाठी आंदोलन केल्यानंतर चासकमान अधिकाऱ्यांना नेमून दिलेल्या वेळेमध्ये पाणी न सोडल्यामुळे शेतकऱ्यांनी कालव्याचा दरवाजाचे लॉक बेकायदेशीरपणे तोडून पाणी वळविले होते. याप्रकरणी शेतकऱ्यांवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत चासकमान पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता महेंद्र महादेव गायकवाड यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी समाधान डोके, नितीन दरेकर, अविनाश दरेकर, राजाराम केवटे (संपूर्ण नाव, पत्ते माहीत नाहीत) यांसह अनोळखी 60 ते 65 शेतकरी त्यामध्ये 15 ते 20 महिला शेतकरी यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा तसेच आदी गुन्हे दाखल केले आहेत.
करंदीसह परिसरातील जातेगाव खुर्द, शिक्रापूर भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी शेतकऱ्यांनी चासकमान पाटबंधारे विभागाकडे मागणी केली होती. सध्या कालव्याला सोडण्यात आलेले पाणी न्हावरे भागासाठी असल्यामुळे येथील शेतकऱ्यांना पाणी देता येणे शक्य नव्हते. सहा मे रोजी या भागातील शेतकऱ्यांनी करंदी येथे चासकमान कालव्याजवळ पाण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता प्रेमनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून वरिष्ठांशी चर्चा करून पाणी सोडण्याबाबत निर्णय घेऊ असे सांगत शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्यास सांगितले होते.
त्यानंतर नऊ मे रोजी उपविभागीय अभियंता प्रेमनाथ शिंदे यांनी या शेतकऱ्यांना सद्यस्थितीत पाणी सोडता येणार नसल्याबाबतचे लेखी पत्राद्वारे कळविले असता दुसऱ्या दिवशी 10 मे रोजी सकाळच्या सुमारास 100हून अधिक शेतकऱ्यांनी येऊन चासकमान कालव्याचे गेटचे लॉक तोडून पाणी वळविले. यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यानच्या काळात शिक्रापूर पोलीस, पाटबंधारे विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी हजर झाले.
शेतकऱ्यांना समजावून सांगत कायदा हातामध्ये घेऊन अशाप्रकारे बेकायदेशीरपणे पाणी घेऊ नका, असे समजून सांगितले. त्यावेळी समाधान डोके नितीन दरेकर अविनाश दरेकर राजाराम उपस्थित होते. त्यांच्यासह 60 ते 65 शेतकरी त्यामध्ये 15 ते 20 महिला शेतकरी यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला, असा आरोप ठेवला आहे.