Ravet House Robbery – शेजारी म्हणून ज्याच्यावर विश्वास ठेवला, त्याच व्यक्तीने घरफोडीचा डाव रचल्याची धक्कादायक घटना रावेत परिसरात उघडकीस आली आहे. नम्रता ग्लोरिया सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका भाडेकरूने डुप्लिकेट चावी तयार करून शेजाऱ्याच्याच फ्लॅटमध्ये प्रवेश केला आणि लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. मात्र रावेत पोलिसांनी हा गुन्हा काही दिवसांतच उघडकीस आणला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. रावेत परिसरातील नम्रता ग्लोरिया सोसायटीमध्ये राहणारे ब्रजेश कुमार सावळिया (वय २९) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. त्यांच्या ए/६०४ या फ्लॅटमध्ये ४ ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत चोरी झाली. कुटुंब बाहेर असल्याची संधी साधून आरोपीने आधीच बनवून ठेवलेल्या डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने फ्लॅटचा दरवाजा उघडला आणि कोणालाही संशय न येऊ देता घरातील मौल्यवान दागिने व रोकड चोरून नेली. चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे चार तोळ्यांचा सोन्याचा नेकलेस, तीन सोन्याच्या अंगठ्या, सोनसाखळी, कानातील दागिने तसेच १२ हजार रुपयांची रोकड असा एकूण तब्बल ४ लाख ४७ हजार ५५२ रुपयांचा ऐवज होता. चोरी अतिशय नियोजनपूर्वक करण्यात आल्यामुळे सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा समोर येत नव्हता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रावेत पोलीस स्टेशन. घटनेची माहिती मिळताच रावेत पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. घटनास्थळाची सखोल पाहणी, सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि स्थानिक माहिती यांच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला. प्रत्येक हालचालीचा मागोवा घेत तपास पथकाने संशयाची सुई सोसायटीतच राहणाऱ्या एका भाडेकरूकडे वळवली. तपासादरम्यान समोर आलेली माहिती धक्कादायक होती. अजिंक्य राजू वनारसे हा आरोपी याच सोसायटीमध्ये भाड्याने राहत होता. सोसायटीतील हालचालींची माहिती असल्याने त्याने आधीच योग्य संधीची वाट पाहिली. फ्लॅट काही दिवस बंद राहणार असल्याचे लक्षात येताच त्याने डुप्लिकेट चावी तयार करून चोरीचा प्लॅन अंमलात आणला. चोरीनंतर मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला व्यवसायाने सोनार असलेल्या लक्ष्मण पृथ्वीसिंग याची साथ मिळाली. ठाण्यातून दोन आरोपींना अटक रावेत पोलिसांनी तपासाची दिशा अचूक पकडत आरोपींचा ठावठिकाणा शोधून काढला. पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. “आजकाल मोठ्या सोसायट्यांमध्ये भाडेकरूंची ये-जा वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक सोसायटीने भाडेकरूंची संपूर्ण माहिती पोलिसांकडे नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी घर दीर्घकाळ बंद ठेवताना विश्वासार्ह व्यक्तींना माहिती देणे, सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम ठेवणे आणि संशयास्पद हालचाली तात्काळ पोलिसांना कळवणे गरजेचे आहे. नागरिक आणि पोलीस यांच्यातील समन्वय मजबूत असेल तर अशा गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसू शकतो.” – नितीन फटांगरे, वरिष्ठ पोलीस फटांगरे