पुणे – खून्नसपणे बघत असल्याच्या कारणावरून अपहरण करून खून करणाऱ्या चौघांना जन्मठेपेची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस.एच.ग्वालानी यांनी सुनावली. चारही आरोपींनी समाजविरोधी गंभीर कृत्य केले आहे. त्यांना जास्त शिक्षा देण्याची मागणी विशेष सरकारी वकील बी.ए. आलुर यांनी केली.
सागर कानू खंडाळे (वय 23), सतीश दत्तात्रय बाठे (वय 38), नीलेश हिराजी ताठे (वय 24, तिघेही, रा. चिखली) आणि विशाल बाळासाहेब मेमाणे (वय 27, रा. चिंचवड) अशी शिक्षा झालेल्या चौघांची नावे आहेत. माणिक अंकुश उदागे (वय 22, रा. निगडी) असे खून झालेल्याचे नाव असून, याबाबत 41 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.
सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील बी.ए.आलुर यांनी काम पाहिले. त्यांनी 27 साक्षीदार तपासले. 1 मे 2014 रोजी उदागे याचे अपहरण करण्यात आले. त्यावेळी त्याच्या घरच्यांशी हरविल्याची तक्रार दिली होती. दरम्यान मोशी येथील दगडाच्या खाणीत नेवून त्याचा निर्घूण खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्या मृतदेहाचा फोटो आणि कपडे पाहून ओळख पाहून आई आणि भावाने तो माणिक असल्याचे ओळखले. कुटुंबाच्या विनंतीवरून आलुर यांची विशेष सरकारी वकील म्हणून या प्रकरणात नियुक्ती झाली.
पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रमेश भुरेवार, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी तपास केला. त्यांना पोलीस हवालदार नारायण पवार आणि पांडुले यांनी मदत केली. न्यायालयाने चौघांना भारतीय दंड संहिता कलम 302 नुसार (खून), 364 अन्वये ( अपहरण) नुसार पाच वर्षे आणि कलम 201 (पुरावा नष्ट करणे) नुसार 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली असून, सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. ऍट्रॉसिटीच्या आरोपातून मात्र सर्वांची मुक्तता करण्यात आलेली आहे.