अमित डोंगरे
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याचे मैदानावरचे वावरणे म्हणजे कोणीतरी संस्थानिक असल्यासारखे वाटते. संघातील त्याचे कर्णधारपद असल्यामुळे त्याला थेट बोलण्याची हिंमत कोणीही करणार नाही परंतु तो निट वागत नाही अशा तक्रारी यापूर्वीही काही खेळाडूंनी थेट बीसीसीआयकडे केल्याचे सांगितले जात आहे.
पंड्याची कारकीर्द पाहिली तर एक नैसर्गिक आक्रमक खेळाडूच नव्हे तर अष्टपैलु. टीपीकल वेस्ट इंडीयन क्रिकेटपटूंसारखी बेदरकार देहबोली व फलंदाजी तशीच बेधडक. मात्र, त्याच्या ज्या गुणांचे सुरुवातीला कौतुक झाले तेच आज त्याच्या प्रतिमेसाठी धोकादायक ठरत आहेत. आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी म्हणतात तसेच. संघातील ज्या गोलंदाजाने चौकार व षटकार दिला की पंड्याच्या तोंडून जे मधाळ शब्द बाहेर पडतात ते एखादा लिपरीडर निश्चितपणे सागू शकतो की त्याने काय म्हटले आहे.
स्वतःच्या गोलंदाजीवर समोरच्या फलंदाजाने आक्रमक फलंदाजी केली तर मात्र, चूक त्याची नसते तर ते चौकार ज्यांनी अडवले नाहीत त्या क्षेत्ररक्षकांची असते. फलंदाजी करताना पंड्या पूर्वी संघाची स्थिती व गरज हे दोन्ही ओळखून खेळायचा. म्हणजे आक्रमकच फलंदाजी करत होता पण कमीत कमी धोका पत्करुन आता तो बेदरकारपणे फलंदाजी करतो व त्याच प्रयत्नात बादही होतो. मात्र, हा विचार करत नाही की मोक्याच्या क्षणी आपण बाद झालो तर संघाला विजय कसा मिळेल.
शेरमन हेटमायरने अनेकदा गुजरातला संकटातून वाचवले आहे पण तो प्रत्येक सामन्यात असे करु शकत नाही. म्हणूनच कर्णधाराने पुढाकार घेत स्वतः कामगिरी केली पाहिजे व अन्य खेळाडूंनाही प्रोत्साहित केले पाहिजे, तरच तो मोठा कर्णधार ठरतो. पंड्याचा स्वभाव ……..बदलला हे निश्चित. रणजी खेळणारा लाजरा बुजरा पंड्या हरवला व अत्यंत अहंकारी आणि समोर किती वरिष्ठ खेळाडू असला तरीही त्याचे माप काढण्यापूर्वी कोणताही विचार न करता अत्यंत उर्मट खेळाडू बनला आहे.
त्याच्याकडे भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व आहे आता पुढील काळात एकदिवसीय सामन्यांच्या संघाचे नेतृत्वही येण्याची शक्यता आहे. स्वभावाला मुरड घातली नाही तर भाजी-आमटीतील कढीपत्त्याप्रमाणे कधी बाहेर काढले जाईल त्यालाही कळणार नाही. उदाहरणे पाहिली तरी हेच समोर येते. इतका अहंकार का व कशासाठी असा प्रश्न त्याला विचारावासा वाटतो. सौरव गांगुली विराट कोहली यांचे काय झाले ते पाहता पंड्याही त्याच वाटेवरून चालला आहे.