– अमित डोंगरे
आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यापासूनची एक ओरड आहे की नेमका मार्च, एप्रिल आणि मे हाच कालावधी का निवडला जातो. अर्थात ही मागणी अजिबात खोटी नाही. या कालावधीतच ही स्पर्धा घ्यावी का, याचा विचार आता खरोखरच केला जावा.
गेल्या वर्षी काय किंवा यंदा काय करोनाच्या धोक्यामुळे ही स्पर्धा या काळात होत आहे. त्यावर कोणीही काहीही बोलणार नाही. उलट लॉकडाऊनच्या सावटात ही स्पर्धा होत आहे. लोकांना घरातच थांबवून ठेवण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे, असेही म्हणता येईल.
गेल्या वर्षी जगभरासह भारतातही करोनाचा धोका वाढला. ही स्पर्धा आयत्यावेळी अमिरातीत घेतली गेली. तीदेखील सप्टेंबर महिन्यात. मग दरवर्षीच ही स्पर्धा सप्टेंबर ते डिसेंबर यापैकी कोणत्याही कालावधीत घेता येणार नाही का. उलट या काळात मुलांच्या परीक्षा नसतात. त्यामुळे पालकांनाही मुलांना घरातच कसे बसवून ठेवायचे, हा प्रश्न निर्माण होणार नाही.
स्पर्धेच्या प्रायोजकांनाही याबाबत काही आक्षेप राहणार नाही. कारण मुलांच्या परीक्षांचा कालावधी सोडून ही स्पर्धा खेळवली जात असेल, तर त्याला प्रेक्षकवर्गही जास्त मिळेल. तसेच आयपीएलच्या टीआरपीत वाढ होऊन बीसीसीआयलाही वाहत्या गंगेत हात धुऊन घेता येईल. बीसीसीआय व आयपीएल समिती यांनी याचा जरूर विचार करावा.
दुसरीकडे या कालावधीत तसे पाहायला गेले तर कोणत्याही महत्त्वाच्या मालिका होत नाहीत. अनेक ठिकाणचा पावसाळाही संपलेला नसतो. भारतात तर हिवाळा सुरू झालेला असतो. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड यांच्याही मालिका नसतात. त्यामुळे सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांचा कालावधी आयपीएलसाठी निश्चित केले गेला, तर बीसीसीआयला प्रेक्षक धन्यवादच देतील.
तसेच या काळात आयसीसीच्यादेखील काही स्पर्धा नसतात. यंदा सप्टेंबरमध्ये टी-20 विश्वकरंडक स्पर्धा घेण्यात येत आहे. ती गेल्या वर्षी करोनामुळे लांबणीवर टाकली गेली म्हणून. आता दरवर्षी आयसीसी व बीसीसीआयसह सगळ्या देशांच्या क्रिकेट मंडळांना ही विंडो आयपीएलसाठी देऊन अन्य कालावधीत आंतरराष्ट्रीय मालिकांचे आयोजन करणे सोपे ठरेल.