मुंबई – भारताबाहेर पलायन करणारा हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या मालमत्ता जप्त करण्याची परवानगी सोमवारी येथील विशेष न्यायालयाने दिली. नव्या फरार आर्थिक गुन्हेगार कायद्याच्या अंतर्गत न्यायालयाने दिलेला तो देशातील पहिलाच आदेश ठरला आहे.
कोट्यवधी रुपयांच्या पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) घोटाळ्यातील नीरव हा मुख्य आरोपी आहे. भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आल्यामुळे तो देशाबाहेर पसार झाला. ब्रिटनमध्ये आढळल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तो सध्या लंडनमधील तुरूंगात आहे. त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या उद्देशातून भारतीय यंत्रणा सक्रिय आहेत.
अशातच न्यायालयाच्या आदेशामुळे नीरवला मोठा झटका बसला आहे. पीएनबीकडे गहाण नसलेल्या त्याच्या मालमत्ता जप्त करण्याची परवानगी न्यायालयीन आदेशामुळे सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) मिळाली. सुमारे दोन वर्षांपूर्वी लागू करण्यात आलेल्या कायद्यांतर्गत त्या मालमत्ता महिनाभरात जप्त करण्यास ईडीला सांगण्यात आले. नव्या कायद्यांर्गत जप्त करण्यात आलेल्या नीरवच्या मालमत्तांचा ताबा केंद्र सरकारकडे जाणार असल्याचे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले.