करोनाचे संकट सर्वव्यापी झाले आहे. लोक घरात बंदीस्त आहेत. रस्ते निर्मनुष्य झाले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांपासून खासगी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व सेवा थंडावल्या आहे. इतरही सर्व रहदारी ठप्प झाली आहे. अशा अवघड स्थितीत एक व्यक्ती मात्र निश्चल उभा आहे. तो म्हणजे देशाच्या सीमेवरील रक्षक आणि दुसरा अंतर्गत सीमांचे रक्षण करणारा खाकी वर्दीतील पोलीस.
गेल्या काही काळात विशेषत: महिनाभरात पोलिसांवरचा ताण कमालीचा वाढला आहे. संशयितांना ट्रेस करण्यापासून, नाक्यानाक्यांवर वाहनांची तपासणी करण्यापर्यंत अनेक कामे रणरणत्या उन्हात ते करत आहेत. विनाकारण हिंडणाऱ्यांना चाप लावणे, अनावश्यक गर्दी करणाऱ्यांना रोखणे, लॉकडाउनचा गैरफायदा घेतला जात नाहीये ना, याची खातरजमा करणे अशी सगळी कामे त्यांच्यावर पडली आहे. किंबहुना केंद्रातले सरकार आणि राज्यातले सरकार जे काही निर्णय घेत आहेत, त्याची खालच्या स्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा भार त्यांच्यावरच आहे. करोना हा अदृश्य शत्रू आहे.
सर्वसामान्यांप्रमाणेच वर्दीतली माणसेही माणसेच आहेत. त्यांनाही कुटुंब आहे. त्यांच्याबद्दल काळजी वाहणारे घरातील सदस्य आहेत. सगळे घरात असताना त्यांना जड अंतकरणाने निरोप देणारी मंडळी आहेत. या सगळ्यात ते आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्याकडून प्रसंगी संयम सुटल्याच्याही घटना घडल्या आहेत. मात्र, त्या नगण्य. उलट त्यांना समाजकंटकांच्या हल्ल्यांना सामोरे जावे लागण्याचे प्रकारच अधिक घडले आहेत. पंजाबमध्ये एका अधिकाऱ्याचा हातच कापण्याची अमानुष घटना काही दिवसांपूर्वी घडली. पोलिसांवर हल्ल्याचे प्रकार महाराष्ट्रात आणि अन्य काही राज्यांत रोजच घडत आहेत. त्यातूनही स्वत:ला सावरत आणि संयम राखत ही वर्दीतली मंडळी कर्तव्य बजावत आहेत. एकप्रकारे अभूतपूर्व स्थितीला सामोरे जाताना त्यांची अग्निपरीक्षाच घेतली जात आहे.
पोलीस आहे म्हणून त्याला करोनाचा धोका नाही, असे नाही. राजधानी दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांत पोलिसांनाही कामावर हजर असताना लागण झाल्याच्या घटना गेल्या आठवड्यात समोर आल्या आहेत. मुंबईतही काही प्रकरणे उघड झाली आहेत. पुण्यात तर फुटपाथवर पडलेल्या असहाय व्यक्तीला मदत करण्यासाठी धडपडणाऱ्या पोलिसांतला माणूसही नागरिकांनी पाहिला. मात्र, त्यांना आता क्वारंटाईन व्हावे लागले. आता सरकारने मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड वगळता काही ठिकाणचा लॉकडाऊन शिथिल केला आहे. त्यामुळे रस्त्यांवरची हालचाल काही प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे पोलिसांची जबाबदारीही वाढणार आहे.
प्रत्येक व्यक्ती समंजस वागतेच असे नाही. काही आडमुठे लोक परिस्थितीचे गांभीर्य कळूनही मुर्खासारखे वागतात. या लोकांना आवर घालत आणि मानवाधिकार वगैरे बाबी जपत पोलिसांना स्थिती नियंत्रणात ठेवावी लागणार आहे. एकप्रकारे नियमात शिथिलता आली तरी त्यांच्यावरचा भार कमी होण्याऐवजी वाढणारच आहे. मात्र हे सगळे करताना नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखली तर ते पोलिसांचा व्याप बऱ्याच अंशी कमी करू शकतात. कारण ते आज रस्त्यावर उभे आहेत, ते स्वत:साठी नाही. सामाजाच्या भल्यासाठीच ते हे करताहेत. त्यांना कमीतकमी त्रास होईल किंवा अनावश्यक कामात त्यांचा वेळ वाया जाणार नाही, याची दक्षता घेतली तर ही अग्निपरीक्षा ते यशस्वीपणे उत्तीर्ण होतील यात शंका नाही.
ऐ मेरी ज़मीं, महबूब मेरी
मेरी नस-नस में तेरा इश्क़ बहे
“फीका ना पड़े कभी रंग तेरा, ” जिस्मों से निकल के खून कहे..!#StayHomeStaySafe @DGPMaharashtra @CPPuneCity @CMOMaharashtra pic.twitter.com/LuZIxw29rw— PUNE POLICE (@PuneCityPolice) April 19, 2020