नगर – करोना संसर्गजन्य विषाणूचा जिल्ह्यात एकही रुग्ण नाही. याबाबत प्रशासनाने पूर्ण सतर्कता बाळगली आहे. या करोनोवरून अस्वस्थ होण्याची गरज नाही. मात्र, होता होईल तेवढे गर्दी करणे टाळावे, याच दृष्टीने जिल्ह्यात पुढील पंधरा दिवस शासकीय कार्यक्रम, मेळावे रद्द करण्यात आले आहेत.
जिल्हा वासियांच्या सुजाणतेवर प्रशासनाला विश्वास असून, खबरदारी, दक्षता घेण्यासाठी नगरकर स्वंयस्फूर्तीने पुढे येतील,असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.वीरेंद्र बडदे, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.
चीन, इटली, इराण, स्पेन, जर्मनी बरोबरच इतरत्र संसर्ग होत असलेल्या करोना व्हायरस देशासह इतर राज्यात शिरकाव करत असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने 15 दिवसापर्यंत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे द्विवेदी यांनी जाहिर केले. तसेच यात्रा, जत्रा व विविध गर्दी होऊ शकणारे समारंभ टाळावे, मढी येथील यात्रेच्या संदर्भात देवस्थान ट्रस्टचे शिवशंकर राजळे यांच्याशी संपर्क केला आहे. तसेच दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.
आगामी काळात होणाऱ्या यात्रा, उत्सव कार्यक्रमाच्या अनुषंगाने दक्षता घ्यावी, गर्दी होऊ नये, यासाठी नागरिकांनी व संस्थांनी स्वंयस्फूर्तीने पुढाकार घ्यावा असे आवाहन करीत कमीत-कमी कायद्याचा वापर करून परिस्थिती हाताळली जात असल्याचे द्विवेदी सांगितले. नगरकरांच्या जागरूकतेवर प्रशासनाचा विश्वास आहे, असे सांगत प्रतिसाद न मिळाल्यास आपत्ती कायदा लागू करून कारवाईचे पावले उचलली जातील, असे द्विवेदी स्पष्ट केले.
करोनासंदर्भात माहिती देण्यासाठी 1077 हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. मास्क वापर सर्वांसाठी जरुरी नसल्याचे स्पष्ट करीत ते म्हणाले, याच अनुषंगाने ट्रॅव्हल्स अँड टूर्स एजन्सीची बैठक घेतली जाणार आहे. परदेशी जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची माहिती या बैठकीतून संकलित केली जाईल.
त्या चौघांचे रक्त व थुंकीचे नमुने एनआयव्हीकडे
दुबईवरून आलेल्या नगर शहरातील चौघांचे नमुने पुणे येथील एनआयव्ही प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले असून या चौघांना निघराणीखाली ठेवण्यात आले आहे. ते 1 मार्चला नगरला आले असून ते त्यानंतर कोठे कोठे गेले याची माहिती घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
मॉल, सिनेमागृहांना स्वच्छतेचे निर्देश
शहरातील विविध मॉल, सिनेमागृह संचालकांना देखील स्वच्छता विषयक निर्देश देण्यात आले आहेत. अशा ठिकाणी संपर्काच्या बहुतांश जागा नियमित स्वच्छ करणे, आवश्यक आहे. याबाबत दक्षता घेण्याची सूचना संबंधितांना देण्यात आली आहे.