नवी दिल्ली – भारतात करोनाग्रस्तांची संख्या १२ लाखांवर पोहचली आहे. अशातच ५ ऑगस्ट रोजी अयोध्याच्या राम मंदिराचे भूमिपूजनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मोदी, आडवाणींसह 50 व्हीआयपी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशचे भाजप नेते रामेश्वर शर्मा यांनी अजब दावा केला आहे.
रामेश्वर शर्मा म्हणाले कि, श्रीरामाने मानवाचा कल्याणासाठी आणि राक्षसांच्या विनाशासाठी जन्म घेतला होता. राम मंदिराचे बांधकाम सुरु होताच करोना व्हायरस नष्ट होईल, असा दावा त्यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, केवळ भारतच नव्हेतर संपूर्ण जगात करोनाने थैमान घटले आहे. आपल्याला केवळ सोशल डिस्टंसिंग पाळायचे नाही. तर देवाचेही स्मरण करायचे आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, देशभरात सर्वत्र करोना महामारीचे सावट आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला प्राधान्य देत आहेत. करोनामध्ये सापडलेल्या लोकांना कसे बाहेर काढायचे हा महत्वाचा प्रश्न सध्या उभा ठाकला असून या कामालाच आपण प्राधान्य देणे गरजेचे आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. आमच्या दृष्टीने आम्हाला करोनाचे संकट महत्वाचे वाटते. लॉकडाऊनमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था ढासळून गेली आहे. छोटे-मोठे व्यवसायांचे नुकसान होत असल्याने आम्हाला चिंता आहे. केंद्र आणि राज्य सरकारने त्या गोष्टीमध्ये अधिक लक्ष घालावे, असा आमचा आग्रह असल्याचेही त्यांनी सांगितले.