बीड – राज्यात नागपूर, पुणे आणि औरंगाबाद येथे करोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे येथे लॉकडाऊनसंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. आता बीड जिल्ह्यातही जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीसंदर्भात आदेश दिले आहेत. रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी असे आदेश काढले आहेत.
बीडमध्ये आता सायंकाळी ७ ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी कऱण्याचा आदेश देण्यात आला आहे. या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्व व्यावसाय बंद राहणार आहेत. यानुसार जिल्ह्यातील सर्व हॉटेल, खानावळ, बार, रेस्टॉरंट, ग्राहकांसाठी संपूर्णत: बंद राहतील. फक्त पार्सल सेवा सुरू राहतील. सर्व मंगल कार्यालये आणि इतर कार्यक्रम 18 मार्चनंतर अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहेत. आस्थापनाधारक यांनी दर 15 दिवसाला करोना चाचणी करुन त्याचा अहवाल जवळ बाळगणं अत्यावश्यक करण्यात आले आहे.
जिल्ह्यात अनेक व्यापाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. तेव्हापासून प्रशासन सावध झाले आहे. यामुळेच दुकानदार आणि आस्थापनाधारकांना १५ दिवसाला करोना चाचणी करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.