सातारा – जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोनाचा विळखा घट्ट होत चालला असून केवळ कंटेनमेंट झोन जाहीर करण्यापेक्षा प्रभावी उपाययोजना महत्वाची ठरणार आहे. मात्र, कोणत्याच तालुक्यात करोनाची साखळी तुटत नाही, जिल्हाबंदीचा ढोल पिटला तरी जिल्ह्यात येणारे पुणे मुंबईकर यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या उपाययोजनांमधील त्रुटी चव्हाट्यावर येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर होण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.
शिरवळ, जिहे, पुनवडी यांसह कराड तालुक्यातील काही गावांतील साखळी तोडण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. सध्या जिल्ह्यात अशक्त होत चाललेली नियंत्रण व्यवस्था दिसत आहे. अपुऱ्या खाटांसह उपचार करणारी तोकडी यंत्रणा, मर्यादित रुग्णवाहिका, सुरक्षा साधने, टाळेबंदीनंतर पोलिसांमध्येही आलेली शिथिलता हे जिल्ह्यांमधील करोनालढ्यातील कच्चे दुवे ठरत आहेत.
त्यामुळे आधी नियंत्रणात असलेला करोना उलटसुलट निर्णयांमुळे आणि प्रशासनातील ढिलाईमुळे गंभीर रूप धारण करू लागला आहे. मुंबई कनेक्शनमुळे जिल्ह्यात रुग्णसंख्या 1700 च्या पलिकडे पोहचेल अशी अवस्था आहे. जिल्हा यंत्रणेने अधिग्रहित केलेली खासगी करोना केअर सेंटर वाढत्या रुग्णांमुळे अपुरी पडू लागली आहेत. मात्र, उपाययोजनांपेक्षा त्यातील त्रुटीच सातत्याने समोर येत आहे.
जिल्हा रुग्णालयात उपचारांची अवस्था योग्य नसल्याची तक्रार आहे. ग्रामीण भागातून साताऱ्यात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. जिल्हयाच्या ठिकाणी असणाऱ्या मध्यवर्ती रुग्णालयात व्यवस्थापन रोटेशन कामाची चक्राकार पध्दत वापरत नसल्याने अंर्तगत खदखद वाढली आहे.
येयील चार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पगारी रजेचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. सातारा पालिकेचा जलद प्रतिसाद देणारा आरोग्य विभाग ढेपाळला आहे. शहरात नऊ कंटेनमेंट झोन आत्तापर्यंत झाले, या भागांचा घरोघरचे सर्वेक्षण पूर्ण थांबले आहे. टाळेबंदी शिथिल केल्यावर लोकांचे वर्तन बेछूट झाले आहे. रस्ते, चौक, बाजारपेठा, मंडई या प्रत्येक ठिकाणी लोक नेहमीप्रमाणे गर्दी करत आहेत.
मंगळवार तळे रस्त्यावर भरणारी मंडई खुलेआम नियमांना आव्हान देत आहे. साताऱ्यातील बहुतांश रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. परंतु या रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा इतर रुग्णालयांत आणण्यासाठी पुरेशा रुग्णवाहिकाही उपलब्ध नाहीत. दुर्गम भागातील रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी आणण्यासाठी खासगी वाहनेही कुणी देत नाही. रुग्णवाहिका मिळाली तरी ती चालवण्यासाठी चालक मिळत नाहीत. या साऱ्यामुळे रुग्णास उपचार मिळण्यास उशीर होतो आहे.